मुंबई – साकीनाका घटनेने राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेतले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. “महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला अटकाव करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. हा सामाजिक प्रश्न आहे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. अजून महिला आयोगाला अध्यक्ष नाही. शक्ती कायद्याचा अतापता नाही” अशी टीका वाघ यांनी केली.
दरम्यान, राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी, “भाजपचे लोक विरोधी पक्षात आहेत. ते सरकारवर चिखल फेकत आहेत. राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे.” असं वक्तव्य केलं होत. राऊत यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून वाघ यांनी त्यांना, “तुमच्यात सरकारच थोबाड फोडण्याची हिम्मत आहे का?” असा थेट प्रश्न विचारला आहे.
चित्रा वाघ यांनी, “मला सर्वज्ञानी संजय राऊतांना विचारायच आहे, त्यांनी राज्यपालांना सांगितलं, विरोधकांच थोबाड फोडायला पाहिजे. मला आता संजय राऊतांना विचारायच आहे, कोणाचं थोबाड फोडलं पाहिजे. तुमच्यात सरकारच थोबाड फोडण्याची हिम्मत आहे का? सरकारला प्रश्न विचारण्याची हिम्मत आहे का?” असे थेट सवाल राऊत यांना विचारलेत.
29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती
दरम्यान, डोंबिवली अत्याचार प्रकरणातील आरोपींमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची मुले असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळाली आहे. पीडितेच्या प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलीवर बलात्कार करत व्हिडीओ काढला. या व्हिडीओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.