मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली. तसेच आज सकाळी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थान छापेमारीही करण्यात आली. या घटनेवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरून केंद्र सरकार निशाणा साधला आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. दरम्यान, सदानंद कदम आणि हसन मुश्रीफ यांच्यावरील करण्यात आलेल्या घटनांवरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार टीकास्र सोडले आहे. या कारवाया राजकीय सुडबुद्धीने सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सदानंद कदम हे शिवसेनेमध्ये पदांवर नसतील, पण ते शिवसेनेच्या परिवारातील आहेत. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. कदम यांना काल अटक केली. मात्र, त्यांच्या अटकेआधी त्यांना अटक होणार हे आमचे मुलुंडचे पोपटलाल बोलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कोणतंही कारण नव्हतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांच्याभोवती ईडीने फास आणखी आवळला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. याच कारवाईवरून संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली आहे.