मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे दिसत आहे. कारण सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याच मागणीला दुजोरा दिला आहे. राठोड मात्र राजीनामा देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत आहेत.
पूजा चव्हाणचा संशयास्पद मृत्यूचे प्रकरण भाजपने लावून धरले आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम आहे. सत्ताधारी शिवसेना राठोड यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची संधी आयतीच मिळेल.
संजय राठोड यांना ‘मातोश्री’चे अभय असल्याचे चित्र निर्माण झाले. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने राठोड यांची बाजू लावून धरली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतही दोन मतप्रवाह होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले.
प्रत्येक वेळी फडणवीस यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना अभय दिले होते. या पाश्र्वभूमीवर राठोड यांचा लगेचच राजीनामा घेऊ नये, असा मतप्रवाहही पक्षात आहे. विधानसभेत फडणवीस यांनी आरोप केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांवर झालेले आरोप आणि या मंत्र्यांना कसे पाठीशी घातले याची जंत्रीच सभागृहात सादर करण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.