मुंबई – मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनजवळ आज स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी लॉकडाउन आणि सरकारी निर्बंधांविरोधात निदर्शने केली. कॉंग्रेस नेते संजय निरूपम हे देखील या हॉटेल व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी यावेळी उपस्थित होते. यावेळी निरूपम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना यावेळी संजय निरूपम म्हणाले, मुद्दा केवळ एवढाच आहे की करोनाशी आपल्याला लढायचे आहे आणि हे कुणीच नाकारत नाही, पण लढण्यासाठी जगणे महत्वाचे आहे. विविध निर्बंध आणून ज्या प्रकारे लोकांचा धंदा बंद केला जात आहे, त्यामुळे बेरोजगारी पुन्हा एकदा वाढेल. व्यवसाय बंद पडतील व संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. लोकांसमोर भूकबळीचे संकट निर्माण होईल.
तसेच, मागील लॉकडाउनमुळे जनता एवढी उद्धवस्त झाली आहे की, अद्यापपर्यंत स्थिरावलेली नाही. आता करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नावाखाली, जो तमाशा सुरू आहे तो बंद व्हायला हवा. लॉकडाउनची कुठलीही आवश्यकता नाही. काही सावधानता बाळगण्यासाठी हॉटेलवाले देखील तयार आहेत, मुंबईचे सर्वसामान्य नागरीक देखील तयार आहेत. त्या दक्षतेची व्याख्या करा, त्या समजवा. हॉटेल, रेस्टॉरंट व उर्वरीत व्यवसाय कसे चालतील? याची काळजी सरकारने करायला हवी.
आमचे म्हणणे सरकारने ऐकावे. सर्वसामान्य नागरिक, उद्योजकांच्या अडचणी त्यांनी ऐकाव्यात आणि जेवढे लवकर होईल तेवढे लॉकडाउनची धमकी देण्याऐवजी काही दक्षता बाळगण्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनांबरोबर सर्वांना सोबत आयुष्य जगण्याची संधी द्यावी, अशी मागणी देखील निरूपम यांनी केली.
निरूपम नाईट कर्फ्यूच्या मुद्यावर बोलताना म्हणाले, रात्री हॉटेल बंद असणे म्हणजे हॉटेलचा धंदा संपूर्णपणे नष्ट करणे. बिअर बार, पब इत्यादी ज्या काही बाबी असतील त्या तुम्ही बंद करा, पण सामान्य जी काही हॉटेल्स आहेत त्यांचा व्यवसाय या वेळेतच होत असतो, तीच त्यांच्या धंद्याची वेळ असते. त्याला देखील तुम्ही नाईट कर्फ्यूच्या नावाखाली बंद करत आहात, हा उघडपणे अन्याय आहे.