मुंबई – भारतीय समालोचकांच्या पथकातून वगळलेल्या संजय मांजरेकर यांना भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी पुन्हा एकदा समालोचन करण्याची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च महिन्यात भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेपासून त्यांना समालोचकांच्या पथकातून वगळण्यात आले होते. सतत वादग्रस्त वक्तव्ये करण्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. त्यांना अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतही समालोचन करण्याची संधी देण्यात आली नव्हती. त्यावेळी त्यांनी बीसीसीआयकडे माफिनामाही सादर केला होता.
मात्र, त्यावर बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. मात्र, आता त्यांच्याबाबत बीसीसीआयने थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत असून येत्या 27 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेपासून ते समालोचकांच्या पथकात परतणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ 3 एक दिवसीय, 3 टी-20 व 4 कसोटी सामने खेळणार आहे.
म्हणून देण्यात येणार संधी
या मालिकेतील सर्व हक्क ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडे आहेत, त्यामुळे त्यातून मांजरेकरांना बाहेर काढण्याचा हक्क बीसीसआयकडे नाही. म्हणूनच त्यांचा समावेश केला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारतात येत असून त्यावेळी पुन्हा एकदा मांजरेकरांना डच्चू दिला जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.