-अमित डोंगरे
क्रिकेटमध्येच नाही तर कोणत्याही क्षेत्रांत निंदकाचे घर असावे शेजारी, असे म्हणतात; पण हे टीकाकार कीती अभ्यासू आहेत ते महत्त्वाचे आहे. केवळ रिकामपण खायला उठते व प्रसिद्धीच्या झोतात कायम राहता यावे यासाठी केलेल्या उचापती रिकामटेकड्यांचे उद्योगच ठरतात. याचेच ताजे उदाहरण भारतीय संघाच्या निवडीनंतर सुरू झालेल्या वक्तव्यांवरून सिद्ध होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली आणि या टीकाकारांना तोंड फुटले. या सर्व टीकाकारांचा मेरुमणी माजी कसोटीपटू संजय मांजरेकर आहे. आधीच त्याला यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठीच्या समालोचकांच्या पथकात घेतलेले नसल्याने त्याचे उट्टे तो भरून काढत असावा. पण कोणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी हे माजी कर्णधार कृष्णम्माचारी श्रीकांत यांनाही कळू नये याचेच आश्चर्य वाटते.
संघ निवड झाली त्यात मुंबईच्या सूर्यकुमार यादवचा समावेश नसल्याने अनेकांनी निवड समितीवर टीका केली. त्याचे कवित्व संपत नाही तोपर्यंत मांजरेकर यांनी लोकेश राहुलच्या निवडीवर आक्षेप घेतला. आयपीएलमधील कामगिरी ग्राह्य धरून राहुलला कसोटी संघात का स्थान दिले गेले. इतकेच नाही तर त्याला संघाचे उपकर्णधारही का केले गेले. बीसीसीआय हा अत्यंत चुकीचा पायंडा पाडत आहे, असे मत मांजरेकर यांनी व्यक्त केले.
खरेतर त्याकडे सरळ सरळ दुर्लक्षच केले गेले पाहिजे होते. मात्र, बीसीसीआयच्या पदावरून आता बराच काळ लांब असलेल्या श्रीकांत यांना गप्प बसवले नाही व त्यांनीही मांजरेकर यांच्यावर ताशेरे ओढले. राहुलची कसोटी सामन्यांतील कामगिरी सरस आहे, तसेच त्याचे यष्टीरक्षणही चांगले होत आहे. तसेच आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व देखील तो अत्यंत हुशारीने करत आहे. अशी वक्तव्ये करत श्रीकांत यांनी निवड समितीची पाठराखण केली. तसेच मांजरेकर यांना सध्या कोणतेच काम नाही त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत, असा टोलाही लगावला.
एक गोष्ट कळत नाही की ज्याची निवड केली किंवा ज्यांनी निवड केली ते बाजूला राहिले व याच दोघांमध्ये वक्तव्यांची लढाई जुंपली. आपल्या देशात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. एखाद्या पदावर असताना या व्यक्ती मूग गिळून गप्प बसतात आणि पद गेल्यावर त्यांना अक्कलदाढ येते. एमएसके प्रसाद काय किंवा श्रीकांत किंवा दीलीप वेंगसरकर काय हे लोक जेव्हा निवड समितीचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांच्यावर कोणाचे दडपण होते, काय त्यावेळी चुकीच्या गोष्टी घडल्या हे कधीच सांगितले नाही आणि आता मात्र, सातत्याने मत व्यक्त करत निवड समिती कशी चुकली यावर बोलत आहेत.
हे लोक एक खेळाडू म्हणून खूप मोठे आहेत किंवा होते यात वाद नाही. पण ते सध्या जी मते व्यक्त करत आहेत ते पाहिले तर त्यांच्या काळात त्यांनी कीती होतकरु खेळाडूंना संधी दिली याचा विचार त्यांनीच केला पाहिजे. केवळ वेळ जात नाही व प्रसिद्धीही मिळत नाही म्हणून प्रत्येक विषयावर बोललेच पाहिजे अशी त्यांनी समजूत झाली असावी.
खरे सांगायचे तर फुकट प्रसिद्धी कोणाला नको असते. त्यातही ब्रेकिंग न्यूज किंवा 24 तास वाल्यांमुळे सातत्याने अशा लोकांना मत व्यक्त करण्याची संधी मिळते, त्यासाठी कधाचीत मानधनही घेतले जाते. पण जेव्हा मान संपेल त्यावेळी धनही मिळणार नाही हे का कळत नाही. बाकीच्यांचे सोडा पण पुलाखालून इतके पाणी वाहून गेल्यावर मांजरेकरांनाही या गोष्टी कळू नयेत हे आणखी एक नवल.
मुळात ते जेव्हा समालोचक म्हणून कार्यरत होते तेव्हाही त्यांनी सह समालोचकांची तसेच काही क्रिकेटपटूंची आलोचनाच केली. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना यंदाच्या आयपीएलमधील समालोचकांच्या पथकातून बाहेर ठेवले गेले. मात्र, सुंभ जळाला तरी पिळ जळत नाही म्हणतात याचीच साक्ष ते देत आहेत.
टीकाकारांनी टीका करावी तो त्यांचा हक्क आहे हे देखील मान्य पण म्हणून प्रत्येक गोष्टीवर टीका करण्यापेक्षा काही गोष्टी समजून घेतल्या तरच एक अभ्यासू टीकाकार अशी त्यांची ओळख कायम राहील, अन्यथा त्यांचे अस्तित्व केवळ वाचाळवीर म्हणून उरेल.