मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा काल मध्यरात्री निकाल लागला आहे. त्यानंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, जळगाव मतदार संघाचे भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय कुटे यांनी,“गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शासन चाललं आहे, ते पाहता केवळ अपक्ष आमदारच नव्हे, तर सत्तेतील आमदार देखील नाराज आहेत. प्रत्येकाला आपल्या मतदार संघासाठी काम करायचं असतं. मतदार संघांतील साडेतीन लाख मतदारांची आमदाराकडून अपेक्षा असते. त्यामुळे निधी न देण्याच्या धमकीला अपक्ष आमदार घाबरणारे नाहीत. सत्तारुढ असो किंवा भाजपाचे आमदारही अशा धमकीला घाबरणार नाहीत.”
“कारण आमदार हे काही कुणाच्या घरचे गडी नाहीत. जसे संजय राऊत मातोश्रीचे घरगडी असतील किंवा विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींकडे घरगडी असतील. त्याप्रमाणे अपक्ष आमदार हे काही कुणाकडे घरगडी म्हणून काम करत नाहीत. त्यांचा स्वत:चा स्वाभीमान आहे,” अशा शब्दांत संजय कुटे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर खोचक टीका केली आहे.
त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की, “महाराष्ट्रात कुणाचीही ताकद नाही, की ते निधी थांबवतील किंवा देणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचं प्रतिनिधीत्व करतो, ही जनता पाकिस्तानातून आलेली नाही. ही राजेशाही थोडीच आहे. लोकशाहीत निधी मिळवणं हा आमचा हक्क आहे आणि हा निधी कसा मिळवायचा हे अपक्ष आमदारांना आणि आम्हाला माहीत आहे,” असेही ते म्हणाले.