सांगली – वयाची तिशी पार झाली तरी केवळ अट्टाहासापायी अडून बसलेल्या लग्नाळू वधू- वरांच्या हाताला मेंदीऐवजी सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे. कधी एकदाचे लॉकडाऊन उठते आणि लग्न होते, अशी स्वप्ने अनेकांनी रंगविण्यास सुरुवात केली आहे. नकटीच्या लग्नाला “सतराशे साठ विघ्न’ असं म्हणतात. तसेच काहीस लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या वधू-वरांची झाली आहे. आधीच लग्न ठरणे वयात आलेल्या मुलांसाठी अवघड झाले आहे. सुशिक्षित मुलींच्या अपेक्षा वाढत आहेत.
त्यात हा लग्नाचा हंगाम तर लग्नाळूंसाठी वाया गेल्यातच जमा आहे. “हा नको’, “तो नको’, “मला सूट झाला पाहिजे यारं’ अस म्हणणाऱ्यांचं यावर्षीच तरी भांडवल आवरल आहे. कारण आता लग्नाचे मुहूर्त टळले आहेत. त्यामुळे आता लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्यांना आणखी एक वर्ष तरी “कड’ काढावा लागणार आहे.
लग्न म्हटलं तर तरुण आणि तरुणींच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आणि ज्याच्यासोबत आयुष्य रंगवायचे, त्याच्या नावाची मेंदी रंगविण्याची अनेकजण स्वप्ने पाहत असतात. परंतु, गेल्यावर्षी महापूर आणि यावर्षी करोना महामारीमुळे इच्छुक वधू-वरांना मात्र हातावर एकमेकांच्या नावाची “मेंदी’ लावण्याऐवजी “सॅनिटायझर’ लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकजण कधी एकदाचा करोना संपतो, लॉकडाऊन उठतो आणि हातावर मेंदी रंगते, अशी स्वप्ने रंगवत आहेत. परंतु, या वर्षातील लग्नाचा हंगाम संपत आल्याने लग्न करू पाहणाऱ्या इच्छुकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्यामुळे लॉकडाऊन कधी उठेल याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे लग्नासाठी उतावीळ काही वधू-वरांना आणखी “कड’ काढणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे काहींनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत तर काहींनी ऑनलाईन लग्न उरकले आहे. काहीनी तर लग्नाच्या खर्चात बचत झाल्याने हे पैसे अन्नदान, तसेच गरजूना मदत म्हणून दिले. यातून सामाजिक बांधिलकी दिसली. खरं तरं करोनाच्या संकटामुळे काहींना अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करावा लागला. याच पद्धतीचे विवाह करोनाचे संकट संपल्यावरही व्हावेत. यामुळे अनावश्यक खर्चात बचत होईल. याच पैशांचा उपयोग अनेक चांगल्या कामात होईल.
सोशल मीडियावर स्टेटस
“क्या ख्यॉईशी थी यार..’ “वक्त था मेहंदी लगाने का। नौबत आयी सॅनिटायजर लगाने की।’ ‘काय सांगायचं राव हाताला मेंदी लावण्याच्या वयात सॅनिटायझर लावण्याची वेळ आली.. ‘ असे स्टेटस व्हॉट्सऍप व फेसबुकवर पाहावयास मिळत आहेत. तरुणाई सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह आहे. “टिक टॉक’ सारख्या ऍपवर विनोदी व्हिडिओ तयार करून त्यातून जणू तरुणाई आपली व्यथाच मांडत आहे, असे म्हणायला हरकत नाही.
एकंदरीत यावर्षीच्या लग्नहंगामात जेमतेम एक-दोन महिने लग्नाचे मुर्हूत राहिले आहेत. आपल्याकडे चातुर्मास सुरु होण्याच्या आतच विवाह करण्याची प्रथा आहे. वैशाख, ज्येष्ठ हे महिने पारंपरिक लग्नाचे महिने आहेत. बहुतेक विवाह याच काळात होतात. परंतु, लॉकडाऊनचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर्षी लग्न करून सुखी संसार करण्याचे स्वप्न बघणाऱ्या इच्छुकांना काही महिने तरी हाताला सॅनिटायझरच लावत बसावे लागणार आहे.