पुणे : पुण्यातील राजकीय वर्तुळातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेस सदस्य राजीनामा दिला आहे. ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्ष प्रवेशाआधी संग्राम थोपटे उद्या (20 एप्रिल) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि. 22) मुंबई येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार असून तीन वेळेस ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान, संग्राम थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवरील कव्हर फोटो बदलला आहे.
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवला सामोरे जावे लागले आहे. थोपटे हे तीनवेळा आमदार झाले. मात्र काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रिपदावरून डावलले. विधानसभा निवडणुकीतील पराभव संग्राम थोपटे यांच्या जिव्हारी लागला आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे ?
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र असून, भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
संग्राम थोपटेंचा राजकीय प्रवास?
सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पूत्र
संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला
2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले
2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले
त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली
विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024मध्ये पराभव स्वीकाराव लागला.
संघर्षाचा वारसा त्यांनी जोपासला पाहिजे : हर्षवर्धन सपकाळ
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मध्यंतरी काँग्रेसने संग्राम थोपटे यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचा ठरवलं होतं. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही. त्यांच्या परिवारातला संघर्षाचा वारसा त्यांनी जोपासला पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालं
पुढे बोलताना म्हणाले, संग्राम थोपटे विधानसभेचे अध्यक्ष झाले असते, तर आज हे झालं नसतं. हे सगळे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झालं आहे. संग्राम थोपटे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अन्याय केला. देवेंद्र फडणवीस यांच्या कुठल्याही झाश्यामध्ये त्यांनी येऊ नये. त्यांनी आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये. तसेच गेल्या ११ तारखेला मी भोरमध्ये त्यांच्या घरी गेलो होतो, मात्र संग्राम थोपटे यांची भेट झाली नाही, असंही हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.