सांगली ,सातारा जिल्ह्यातील डाळिंब क्षेत्राला आतंरराष्ट्रीय दर्जा व स्थान मिळवून देण्यासाठी किसान आर्मी व वाँटर आर्मी चे संस्थापक नेते मा. प्रफुल्ल कदम यांनी ‘डाळींब क्रांती अभियाना’ची घोषणा केली असून तीन जिल्ह्यातील 20 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेऊन 15 कलमी कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली आहे .
आज सोलापूर जिल्ह्यात तब्बल 85509 हेक्टर डाळींब क्षेत्र असून त्यापैकी तब्बल 18194 हेक्टर डाळींब क्षेत्र एकट्या सांगोला तालुक्यात आहे. त्यादृष्टीने 15 कलमी कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगोला तालुक्यात आतंरराष्ट्रीय दर्जाचा डाळींब प्रक्रिया उद्योग आणि देशातील पहिली ‘डाळींब बँक’उभा करणार असल्याची घोषणा केली आहे.
स्वतंत्र डाळींब विक्री व्यवस्थापन व माहिती केंद्र उभा करणे ,सांगोला येथे डाळिंब संशोधन उपकेंद्र सुरू करणे ,नव्याने सोलापूर येथे विकसित होणाऱ्या विमानतळावर डाळींबासाठी स्वतंत्र कार्गो हब उभारणे ,डाळींब पिकविमा दुरुस्ती धोरण आणणे, सोलापूर जिल्ह्यासाठी कृषी विभागाअतंर्गत स्वतंत्र डाळींब विकास अधिकारी पद निर्माण करणे,नवीन बँकींग धोरण व व्यवस्था निर्माण करणे ,खतामध्ये होणारी फसवणूक थांबविण्यासाठी डाळींब क्षेत्रात स्वतंत्र नियंत्रण व भरारी पथक नेमणे, डाळींब भवन उभारणे आदी महत्त्वपूर्ण उद्दिष्टांचा समावेश आहे.