सासवड नगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष – नागरिकांचा आरोप
महापुरामुळे लोखंडी कडठे ढासळले व तुटलेले
सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील तीन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरामुळे सासवड शहरातील चांबळी कऱ्हा नदीच्या संगमावरील संगमेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलाचे लोखंडी कडठे ढासळले व तुटलेले असून हा पूल अतिशय धोकादायक बनलेला आहे. महापूर ओसरून तब्बल तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊन देखील सासवड नगर पालिकेला या पुलाकडे बघण्यास वेळच नाही, असे नागरिकांनी सांगितले.
सासवड येथील संगमेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन व पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. या ठिकाणी दररोज शेकडो पर्यटक भेटी देतात या मंदिराकडे जाणारा हा एकमेव पूल असून नदीपात्रातून मंदिराकडे जाताना या पुलावरून जावे लागते या पुलाचे कठडे तुटलेले स्थितीत असून अतिशय धोकादायक स्थितीत असणाऱ्या या पुलावरून पर्यटकांना मंदिरात जावे लागत आहे. यावेळी अचानक तोल जाऊन खाली खोल नदीपात्रात पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने किमान आतातरी नगरपालिकेने जागे होवून या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरीत आहे. संगमेश्वर मंदिर समोरील बंधाऱ्यात साचलेला कचरा देखील काढलेला नसून या ठिकाणी महापुरात वाहून आलेले मोठी झाडे, मेलेल्या जनावरांची सांगाडे या बंधाऱ्याला अडकून त्या ठिकाणी अडकले असून त्याकडेही नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संगमावरील पाणी आठ ते दहा दिवसांत ओसरण्याचा अंदाज असून पाणी ओसरल्यावर लगेच साफसफाई केली जाणार आहे. याकडे नगरपालिकेचे कोणतेही दुर्लक्ष नसून पाण्याअभावी साफसफाई करण्यास अडचणी येत आहेत.
– मोहन चव्हाण, आरोग्य अधिकारी, सासवड नगर पालिका