कविता शेटे
आणखी दोन कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा : शिवसेना गटातून मंत्रिपदासाठी कोल्हापूर, सांगलीत चुरस
सांगली – विधानसभेच्या निवडणुकानंतर अभूतपूर्वरित्या नव्याने उदयास आलेल्या महाविकास आघाडीचे खातेवाटप जाहीर झाले आहे. खाते वाटपाच्या पहिल्याच यादीत सांगली जिल्ह्याला अर्थमंत्री पद मिळाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाच्या कोट्यातून देखील जिल्ह्याला अजून मंत्रीपदे मिळण्याची आशा आहे.
भाजपच्या काळात जिल्हा उपेक्षित रहिला होता. पाच वर्षांच्या कार्यकाळात सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्या रुपाने केवळ शेवटचे दोन महिनेच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले होते. परंतु आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेसकडून आ. विश्वजीत कदम यांना मंत्रीपदाची संधी निश्चित मानली जात आहे. तर शिवसेनेकडून जिल्ह्यात एकमेव आमदार असलेल्या अनिल बाबर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.
सांगली जिल्हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात अग्रेसर राहिला आहे. स्वर्गीय वसंतदादांच्या काळात राज्याच्या राजकारणाची सूत्रे सांगलीतून हलत होती. तोच वारसा पुढे आघाडी सरकारमध्ये स्व. आर. आर. पाटील, स्व. पतंगराव कदम यांच्या रूपाने चालत राहिला. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यात किमान तीन वजनदार मंत्रिपदे निश्चित मानली जात होती. परंतु 2014 साठी भाजपा-सेना सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र जिल्ह्याची मंत्रिपद बाबत परवड झाली. आमदार सुरेश खाडे यांच्या रूपाने अगदी शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यास मंत्रिपदाची संधी मिळाली त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचा रथ ज्या गतीने पुढे सरकायला हवा होता तो सरकला नाही.
आता मात्र नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या पहिल्या सहा मंत्र्यांमध्ये मंत्री जयंत पाटील यांचा शपथविधी होऊन अर्थ खात्याचा कार्यभार मिळाल्यामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा सांगली जिल्ह्याच्या ताब्यात आल्या आहेत. त्याच बरोबर पलूस-कडेगाव चे आ. विश्वजीत कदम यांच्या रूपाने तरुण उमेदवारास कॉंग्रेस पक्षाकडून मंत्रीपदाची संधी मिळणार असून त्यांना कॉंग्रेसच्या कोट्यातील वैद्यकीय शिक्षण खाते मिळणार असल्याची खुमासदार चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यात सेनेचे एकमेव व निवडून आलेले खानापूरचे आमदार अनिल बाबर यांना मंत्रिपद देऊन सेनेकडून त्यांचा सन्मान केला जावा अशी मागणी जोर धरत आहे.
मुळात पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेचे साताऱ्यातून दोन व सांगली व कोल्हापुरातून प्रत्येकी एक आमदार निवडून आले आहेत. सेनेकडून पक्षवाढीसाठी व संघटनात्मक बळकटीसाठी पश्चिम महाराष्ट्रात मंत्रीपद देणे गरजेचे बनले आहे.
त्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटणचे आ. शंभूराजे देसाई व सांगली जिल्ह्यातील खानापूरचे आ. अनिल बाबर यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे आ. बाबर यांच्या रूपाने जिल्ह्यास अजून एखादे मंत्रीपद मिळणार का याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात अर्थखात्याबरोबर आणखी दोन कॅबीनेट मंत्री पदे मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालणा मिळणा आहे.