सांगली – सियाचीन येथे कर्तव्यावर असलेले सांगली जिल्ह्यातील खानापूरचे सपुत्र भारतीय लष्करातील नायब सुभेदार जयसिंग भगत (वय 39) हिमस्खलनात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शहीद भगत यांच्यावर खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. भगत यांच्या निधनाने खानापूरसह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, शहीद भगत यांचे पार्थिव आज पहाटे लष्कराच्या विशेष विमानाने लडाखहून पुण्यात पर्थिव पोहोचले. त्यानंतर सकाळी लष्कराच्या वाहनातून शहीद भगत यांचे पार्थिव त्यांच्या खानापूर या मूळगावी पोहोचले. शहीद जयसिंग भगत यांच्या अंत्ययात्रा खानापुरातून काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, अशा घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहीद जयसिंग भगत हे 2003 मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. शहीद जयसिंग भगत हे मराठा लाईफ इन्फन्ट्रीमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. ते लेह लडाख भागात ग्लेशियर सियाचीन बॉर्डरवर तैनात होते. 14 आणि 15 जानेवारी दरम्यान मोठी बर्फवृष्टी आणि हिमस्खलन झाले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.