सांगली/तासगाव – करोनामुळे संपूर्ण देशामध्ये दि.14 एप्रिल अखेर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांबरोबरच शेतकऱ्यांवरही मोठे संकट आले आहे. सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग हा परिसर द्राक्ष बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील जवळपास 60 ते 70 टक्के द्राक्षांची निर्यात झाली असली तरी अद्याप 30 ते 40 टक्के द्राक्ष निर्यात होणे बाकी आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांवर आर्थिक आपत्ती कोसळली आहे.
तासगाव येथील द्राक्ष बागायतदारांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, की अनेक शेतकरी बागायतदारांची द्राक्षबाग अद्यापी तोडणी वाचून तशीच राहिली आहे. या बागेमध्ये उत्तम प्रकारची द्राक्षे आली आहेत. कंपनीने त्यांच्या द्राक्ष बागेस भेट देऊन सॅम्पलही नेले आहेत. मात्र ज्या भागात ही द्राक्षे निर्यात केली जातात त्या युरोपमध्ये सध्या करोनाचा मोठा प्रादुर्भाव असल्याने युरोप खंड पूर्ण लॉकडाऊन अवस्थेमध्ये आहे. कंपनीने प्रति किलो 95 रूपये दर ठरविल्यानुसार सध्या बागेत द्राक्षांची प्रति एकरी सुमारे दहा लाख किंमत होते.
अशा पद्धतीने सहा एकरात सुमारे 60 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र युरोप खंड बंद असल्यामुळे सदर द्राक्षांची निर्यात होऊ शकत नाही. सध्या बागेत असलेला माल अत्यंत उत्तम स्थितीत असून येत्या आठ ते दहा दिवसात जर बागेची तोड झाली नाही तर ही द्राक्षे बाद होतील. तसेच पक्षीही ही द्राक्षे फोडू लागले असल्याने या बागेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. स्थानिक व्यापारी 20 ते 25 रुपये किलो दराने मागणी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना माल देणे परवडत नाही. ज्या कंपन्या हा माल घेऊन जातात त्या अद्यापी माल उचलत नसल्यामुळे फार मोठे नुकसान होण्याची भीती आहे.