इस्लामपूर(विनोद मोहिते,प्रतिनिधी)- ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत एव्हरेस्टवीर सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी युरोप खंडातील सर्वोच्च एल्ब्रस शिखर पादाक्रांत केले. ते सांगली जिल्ह्यातील पडवळवाडीचे सुपुत्र आहेत. तर नवी मुंबई येथे सेवेत आहेत. गुरव यांनी यापूर्वी एव्हरेस्ट शिखर सर करुन आपल्या आईला यश अर्पण केले होते.
गुरव यांनी काल सोमवारी सकाळी साडेसात वाजता एल्ब्रस हे शिखर सर केले. हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, या मोहिमेच ब्रीदवाक्य ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ हे आहे. या मोहिमेचा फ्लॅग ऑफ माझ्या पाच वर्षाच्या मुलीकडून तर शिखर माथ्यावर एक 12 वर्षीय मुलगी जणू माझ्या मोहिमेच ब्रीदवाक्य सार्थ ठरविण्यासाठी होती.
मुलींना जर योग्य संधी दिली तर ते त्याचं सोन करतात. सध्या सुरु असलेल्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशासाठी पाहिलं पदक मिळवून देणारी मीराबाई चानु एक मुलगीच आहे. अगदी माझ्या गावामध्ये यूपीएससी मार्फत निवड झालेल्या पल्लवी कोकाटे, घरची परिस्थिती बेताची असतानाही फक्तं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर न्यायाधीश पदी निवड झालेल्या दिपाली खोत, आमच्या गावच्या कन्या न्यायाधीश वैशाली कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या शिला खोत, बँक अधिकारी मनीषा कदम अशी किती नाव घ्यावी तेवढी थोडी आहेत.
म्हणजे लेकीना जर संधी दिली तर त्या त्याचं सोन करतात हेच यातुन सिद्ध होत. म्हणून माझी ही मोहीम त्या तमाम लेकीना समर्पित आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वने आपल्या गावाचं, जिल्ह्याच, राज्याचं, देशाचं नाव अजरामर केलं.
थोड या मोहिमे विषयी…!
माउंट एल्बुस हा युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत आहे. या शिखराची उंची 5642 मीटर (18 हजार 510 फूट ) असून काळा समुद्र व कॅरेबियन समुद्राच्या मध्यभागी हे शिखर आहे.हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाले आहे. सध्या एल्ब्रस हा inactive ज्वालामुखी आहे. येथे रात्रीचे तापमान उणे 25 ते उणे 40 अंश सेल्सिअस असते. हे शिखर जरी कमी उंचीचे असले तरी येथील समस्या वेग वेगळ्या असतात. नेहमी बदलणारे वातावरण,बर्फवृष्टी, Whiteout एक ना अनेक समस्या परंतु संकटा पासून पळ न काढता त्याचा धैर्याने सामना केला की यश नक्कीच मिळते.
– संभाजी गुरव (सहाय्यक पोलीस निरीक्षक,नवी मुंबई)
यापूर्वी संभाजी गुरव यांनी 23 मे 2021 रोजी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले होते. एव्हरेस्ट पहिल्याच प्रयत्नात सर करणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी ठरले आहेत.