बंगलुरू – संघ परिवारातील नेते समाजातील विविध जातींना आरक्षणाच्या विषयावरून भडकावण्याचे काम करीत आहेत असा आरोप ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केला आहे. संघ परिवारातील नेत्यांनी फूस दिल्यामुळेच विविध पंथ व जनसमुदायाचे प्रमुख आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने पुकारत आहेत. संघ परिवाराच्या या खोडसाळ प्रचाराला या पंथ किंवा जनसमुदायाच्या नेत्यांनी बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुळात भाजप आणि संघ परिवाराचा आरक्षणालाच विरोध आहे. असे असताना ते विविध जाती धर्माच्या समुदायांना आरक्षणासाठी का भडकवत आहेत असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या मागण्या ढोंगी स्वरूपाच्या आहेत असा आरोपही त्यांनी केला. सामाजिक न्यायाच्या लढ्याची दिशाभुल करण्याचा हा भाजप व संघ परिवाराचा आणखी एक नवीन उद्योग आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
पंचमशाली लिंगायत समाज, वाल्मिकी समाज, कुरूबा समाज, इडिगा समाज अशा समाज घटकांच्या अधिवेशनांना भाजपकडूनच फूस दिली जात असून त्यांना आरक्षणाची मागणी करण्यासाठी भडकावले जात असल्याचा दावा सिद्धरामैय्या यांनी ट्विटरवर केला आहे. पंचमशाली लिंगायत समाजाने अलिकडेच मागास जातींच्या आरक्षणात आपल्या समाजाला 2अ दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. कुरूबांनी एसटी दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे. आणि इडिगांनी एससी दर्जा मिळावा म्हणून मागणी करीत आंदोलनांचा इशारा दिला आहे. त्या संबंधात सिद्धरामैय्या यांनी हा आरोप केला आहे.