नगर – नगर शहरासह केडगाव उपनगरामध्ये आज दुपारी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. केडगावमध्ये गारपिटीचे प्रमाण जास्त होते. अनेक भागात गारांचा खच पडला होता. साधारण अर्ध्यातासानंतर गारपीट थांबून नगरकरांनी उन्हाचाही अनुभव घेतला. तसेच शहरासह संगमनेर, श्रीरामपूर तालुक्यात गारांचा पाऊस झाला. तर श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे एका शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यातच सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शनिवार (दि.18) दुपारी दिड च्या सुमारास पाऊसाला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्षे, संत्रा- मोसंबी या फळबागांचे नुकसान झाले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. विशेषता ः गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. फळबागांमध्ये आंबा, द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले. आंब्याला सध्या मोहर आणि कैऱ्या आल्या आहेत. अवकाळी पावसामुळे या आंबे, द्राक्षांचे नुकसान झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटापासून ते पठार भागातील साकुर फाटा वरुडी फाटा, आणि पठार भागातील इतर गावांमध्ये शनिवार (दि.18) दुपारी जोरदार गारपीट झाली आहे. गारपीट आणि पाऊस यामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक या भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अचानक पावसाबरोबर गाराही पडू लागल्या. या गारा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडल्या की काही काळ महामार्गावर स्नो फॉल झाल्यानंतर रस्त्यावर जसे बर्फ असते तसेच स्वरूप आले होते.
गारांचा सडा पुणे-नाशिक महामार्गावर पडला होता. काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. या भागात टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. याच भागात ही प्रचंड गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाला गारपिटीचा मोठा फटका बसलाय.
अचानक वातावरणात बदल होऊन अर्ध्या तासाच्या आत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गारपिट झाली. गारपिटीचा इशारा दिला होता, तो अखेर तंतोतंत खरा झालाय. विदर्भातही मोठ्या प्रमाणावर शुक्रवारी गारपीट आणि पाऊस झाल्याने तेथील शेती पिकांचेही प्रचंड नुकसान झाल आहे. आज संगमनेर तालुक्याच्या पठार भागाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.
तर श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर रस्त्यावर सिद्धीविनायक मंदिराजवळ झाडाची मोठी फांदी पडल्याने रिक्षाचे नुकसान झाले आहे. तर काही काळ वाहतूक बंद झाली होती. या अवकाळी पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यातही शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे राजेंद्र नामदेव मोरे (वय-60) यांचा वीज पडून मृत्यू झाला असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच एका गायीचा मृत्यू झाला असून शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विजांचा कडकडाट होत असल्यास सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन या विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.