संगमनेर – जोरदार वादळी वार्यासह संगमनेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असणार्या मुंजेवाडी शिवारात भिंत अंगावर पडून तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. तर मालदाड गावातही वार्याने झाड अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंजेवाडी शिवारात विठ्ठल भिमाजी दुधवडे हे कुटुंबासोबत राहत आहेत.
गुरुवारी दुपारी अचानक जोरदार वादळी वारे सुटले व गारांचा पाऊसही पडू लागला. त्यामुळे दुधवडे हे कुटुंबासोबत घरात बसले होते, परंतु अचानक वार्याचा वेग वाढल्याने दुधवडे यांच्या घरावरील पत्रे उडून लांबवर जाऊन पडले. त्याच दरम्यान घराच्या भिंतीही पडल्या.
या भिंती अंगावर पडल्याने विठ्ठल भिमाजी दुधवडे (वय 75), हौसाबाई भिमाजी दुधवडे (वय 67), साहील पिना दुधवडे (वय 10) हे जागेवरच मयत झाले. तर वनिता पिना दुधवडे (वय 8), मंदाबाई विठ्ठल दुधवडे (वय 70) हे जखमी झाले आहेत. घटनेने पठार भागातून हळहळ व्यक्त होत आहे. संगमनेर तालुक्यातील मालदाड गावातही वादळी वार्याने झाड अंगावर पडून सुरेखा राजू मधे (वय 28 रा. डोंगरगाव, ता. अकोले) या मयत झाल्या आहेत.
तालुक्यात दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अचानक जोरदार वार्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळी वार्याचा जोर इतका होता की त्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या खांब व झाडे उन्मळून पडले. त्यात दरम्यान, तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असणार्या मुंजेवाडी शिवारात वादळी वार्याने दुधवडे कुटुंबीयांवर काळाने घाला घातला. वादळी वार्याने अचानक घरावरील पत्रे उडून गेले. पत्रे उडाल्याने भिंतीही पडल्या. त्यात दुधवडे कुटुंबातील तिघांचा अंत झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत महसूल व पोलिसांकडून पंचनामा व मृतांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात आले.
“संगमनेर तालुक्यात झालेल्या वादळ आणि पावसामुळे बर्याच प्रमाणात नुकसान झाले असून त्याबाबत पंचनामे करण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. या पावसात मृत्यूमुखी पडलेल्यांना तातडीने शासनाची मदत देणार आहे.”
– अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर