अमोल मतकर
“सौ शहरी एक संगमनेरी’चा दणका कधी दाखवणार?
संगमनेर – संगमनेरला समृद्ध बनवणाऱ्या प्रवरामाईतून सध्या दिवसा ढवळ्या वाळू चोरी होत आहे. मात्र त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे. मात्र शहरातील जनता ही गप्प का बसली आहे? असा सवाल नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.
यदाकदाचित शहरावर काही प्रसंग ओढावला, तर सौ शहरी एक संगमनेरी, असे दाखवून देणारे संगमनेरकर आता आपल्या जवळील पवित्र प्रवरा नदीची चाळण होताना कसे पाहू शकतात? आता प्रशासन ऐकणार नसेल, तर आपणच आपल्या पवित्र मातेचे रक्षण करून वाळू चोरांपासून आपल्या परिसरातील नदीपात्राला वाचवायला एकत्र येण्याची गरज असल्याचे गंगामाई घाटावर रोज सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे.
वाळूतस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून, ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन संगमनेरी दणका दाखवून सौ शहरी एक संगमनेरीचा हिसका दाखवून दिले पाहिजे, अशा आशयाची पोस्ट सामाजिक माध्यमातून फिरत आहे.
वाळू उपशास आळा घालण्यासाठी सरकारने कडक नियम केले आहेत. परंतु, या नियमांची अंमलबजावणी होत नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूचा उपसा करण्याचा नियम असला, तरी रात्रीच्या वेळेसच वाळूचा उपसा होत आहे.
नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात वाळू भरून गुपचूपपणे गावाच्या बाहेर काढून दिली जातात. संगमनेर शहरातील गंगामाई ते मोठा पूल या दरम्यान मोठ्याप्रमाणात वाळू उपसा होत आहे. आपल्यासमोर प्रवरमाईचे विडंबन होत असताना संगमनेरी जनता व दररोज सकाळी गांगामाईवर फिरायला जाणारी जनता गप्प कशी राहते, हेच समजत नाही. सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवे, अशी चर्चा होत आहे.