संगकाराची चौकशीही व्यर्थ ठरली
कोलंबो – श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी 2011 साली झालेली विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना फिक्स होता, असा आरोप केला होता. त्यानंतर तेथील सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने शुक्रवारी तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा व उपकर्णधार माहेला जयवर्धने यांची कसून चौकशी केली. मात्र, या चौकशीत कोणतेही पुरावे न सापडल्याने हे आरोप अफवाच ठरली.
श्रीलंका सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने संगकाराची तब्बल पाच तास चौकशी केली. तर त्यानंतर जयवर्धनेलाही चौकशीसाठी बोलावले होते व त्याच्यावर देखील अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. या दोन्ही खेळाडूंनी अलुथगमगे यांचे आरोप फेटाळून लावले होते तसेच असे काही घडल्याचे तुमचे मत असेल तर त्याचे पुरावे सादर करा, असेही मत व्यक्त केले होते. श्रीलंकेचे पंतप्रधानपद मिळविण्यासाठी उत्सुक असलेले प्रमुख विरोधक साजीथ प्रेमदासा यांनी या चौकशी नाट्यावर टीका केली असून हा केवळ एक फार्स असल्याचेही म्हटले आहे.
संगकारा व जयवर्धने यांच्यापूर्वी माजी कसोटीपटू अरविंद डिसिल्व्हा व उपुल थरांगा यांचीही चौकशी करण्यात आली. हा सामना जिंकून भारतीय संघाने 1983 नंतर 28 वर्षांनी विश्वकरंडक जिंकला होता. याच सामन्याला फिक्सिंगचे ग्रहण लागल्याचे आरोप झाले होते. मात्र, या चौकशीतून काहीही पुरावे मिळाले नसून, ही चौकशीची फेरी व्यर्थ ठरली आहे.
श्रीलंका सरकार विनाकारण खेळाडूंची चौकशी करून त्यांना त्रास देत आहे, असे मत व्यक्त करत श्रीलंकेतील क्रिकेटप्रेमींनी निदर्शने केली आहेत. हा सामना फिक्स करण्यासाठी श्रीलंकेच्या तत्कालीन सरकारमधील काही व्यक्तींनी सहभाग घेतल्याचे आरोप होत आहेत तर, मग खेळाडूंची चौकशी का केली जात आहे, त्यापेक्षा ज्या मंत्र्यांवर संशय आहे त्यांचीच चौकशी करण्यात यावी, विनाकारण खेळाडूंना मानसिक त्रास देणे योग्य नाही, अशी मते व्यक्त करत चाहत्यांनी सरकारचा निषेध केला आहे.
तपासकार्य बंद
या चौकशीतून कोणतेही पुरावे सापडले नसल्याने ही फाइल बंद करण्यात आली आहे. समितीने श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे नमूद करण्यात आले असून हे तपासकार्य थांबवण्यात आले असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.