मुंबई : करोनाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तर कृषी बाजार समिती बंद असल्याने शेतीमालही पडून असल्याने शेतकरी दुहेरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे. शेतीच्या कामाला विलंब होत आहे तर करोनाच्या भीतीने मजुरही कामावर यायला तयार नाहीत, अशा परिस्थिती मनरेगातून मशागतीची कामे करण्यास मंजुरी द्यावी. यामुळे गावात मजुरांना कामही मिळेल आणि शेतकऱ्यांना मदत होईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. बाळासाहेब राख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.
सर्वत्रच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी दीड महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारने शेती संबंधित कामांना सूट दिली असल्याचे घोषित केले असले तरी करोनाची लागण होईल या भेटीने शेतीमधील कामे करण्यासाठी मजूर येत नाहीत. तर सरकारने कापूस व कडधान्य खरेदी करण्यासाठी काही केंद्रे सुरू केले असले तरी सरकारकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे कधी मिळणार याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत खरीप हंगामात बियाणे खते कुठून खरेदी करायची आणि मशागतीचे कामे कशी करायची असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये उन्हाळी मशागतीचे कामे करण्यासाठी मंजुरी द्यावी.
शेतीच्या बांध बंदिस्त पासून ते अंतर्गत मशागतीला परवानगी दिली तर शेतकऱ्यांना मदत होईल आणि गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारही उपलब्ध होईल. करोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आता सार्वजनिक विकासाची कामे रोजगार हमी योजनेतून सुरू होण्याची शक्यता कमी वाटते. या पार्श्वभूमीवर शेतीमधील मशागतीची कामेच रोजगार हमीतून केली तर अनेक एक प्रश्न कमी होतील. असा विश्वास अॅड. बाळासाहेब राख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे.