नवी दिल्ली – सॅमसंग इंडिया संशोधन आणि विकासापासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत सर्व बाबी भारतात करण्यावर भर देत असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे भारतात रोजगार निर्मीती वाढण्यास मदत होणार आहे. या कंपनीने सरकारच्या उत्पादन आधारीत योजनेत सहभागी होण्याचे ठरविले आहे.
सॅमसंग एम13 आणि सॅमसंग 5-जी 13 फोन सादर केल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी सांगितले की, सॅमसंगचे दक्षिण कोरियाबाहेर सर्वात मोठे संशोधन आणि विकास केंद्र भारतात आहे.
त्याचबरोबर सॅमसंगचा सर्वात मोठा उत्पादन प्रकल्प भारतात कार्यरत आहे. भारतीय ग्राहकांना आमची उत्पादने आवडत असल्यामुळे इतर देशात ती तयार करून भारतात आणण्याऐवजी भारतातच ही उत्पादने तयार करण्याचे आमचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांना आवडणाऱ्या गॅलेक्सी एम सिरीजमधील एक अब्ज डॉलरची उत्पादने यावर्षी विकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय मोबाईल बाजारामध्ये सॅमसंगचा वाटा आता 22.6 टक्के झाला असल्याचे त्यांनी सांगितले. सॅमसंग कंपनी भारतामध्ये 20 वर्षापासून कार्यरत असून आगामी काळातही आम्ही आमची उत्पादने भारतात प्राधान्यक्रमाने सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.