नवी दिल्ली : ‘समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी(दि.26) झाले आहे. हा महामार्ग प्रगती करणारा महामार्ग असून येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे व्यक्त केला.
मुख्यमंत्री शिंदे यांचे महाराष्ट्र सदन येथे शुक्रवारी संध्याकाळी आगमन झाले. यावेळी त्यानी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. समृद्धी महामार्गाबाबत बोलताना ते म्हणाले की, नागपूर ते शिर्डी या 520 कि मी. लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी झाला.
या महामार्गाच्या दुसऱ्या टप्याचा शिर्डीपासून नाशिककडे जाणारा इगतपुरीपर्यंत 80 किमी लांबीचा महामार्ग लोकांसाठी शुक्रवारी(दि.26 मे) खुला केला आहे . याबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग हा केवळ महामार्ग नसून त्या भागाची भरभराट, आर्थिक व भौतिक प्रगती करणारा महामार्ग आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून आज(दि.26) नीती आयोगाची बैठक झाली असून रविवारी(दि.28) नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत.