मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. मलिक यांनी फडवीसांची पोलखोल करणार असल्याचं म्हणत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं विधान केलं होत. तसेच बनावट नोटांसंदर्भातील आरोपांवरून मलिक यांनी तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं. मात्र समीर वानखेडे यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑक्टोबर 2017 रोजी बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकत 14 कोटी 56 लाख रुपयांचे बनावट चलन जप्त केले होते. त्यावेळी हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी वानखेडेंची मदत घेतली होती. तसेच 14 कोटी 56 लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख 80 हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. शिवाय हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही, असंही मलिक यांनी म्हटलं.
समीर वानखेडे यांनी दिलेल्या प्रत्युत्तर म्हटलं की, 2017 मध्ये जप्त केलेल्या बनावट नोटांचे मूल्य 14 कोटी नव्हे तर 10 लाख होते. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हे प्रकरण ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) संपर्क साधला होता, पण त्यांनी तसे केले नाही, असं समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये छापेमारी झाली. त्यात 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा आरोप मलिक यांनी आज सकाळी केला होता.