मुंबई – मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा ‘आर्यन खान’चा सुद्धा समावेश आहे.
सध्या या सर्वांची एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे.
या कारवाईवेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. या आरोपांवर आता समीर वानखेडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
ते म्हणाले,’आम्ही आधीच पत्रकार परिषद घेतली आहे. तरीही मला तुम्हाला सांगायचं आहे की, आम्ही पंचनामा करणाऱ्या नऊ जणांचं नाव दिलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व कारवाई करण्यात आली आहे. आम्ही सर्व अधिकारी सरकारी कर्मचारी आहोत आणि आम्ही आमचं काम करत आहोत’ असं म्हणत त्यांनी आरोपांवर सडेतोड उत्तर दिल आहे.
दरम्यान,समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली असून आर्यन खानच्या नावाला दुजोरा दिला आहे. अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची क्रूझ पार्टी रेव्ह प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे. हे जहाज मुंबईतून गोव्याकडे जात होते. मात्र या जहाजावर एनसीबीने छापेमारी करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.