काळपट चिकटपट्ट्या सर्वांचे लक्ष घेताहेत वेधून
पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू केलेली आचारसंहिता निकालानंतर संपली आहे. त्यानंतर राजकीय पक्षांच्या फलकांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, तरीदेखील शहारातील राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फलकावरील माननीयांची नावे अजूनही चिकटपट्टीने झाकलेली आहेत. या चिकटपट्ट्या आता काळवंडल्या असल्याने शहरात ठिकठिकाणी असे ओंगळवाणे दृश्य पाहायला मिळत आहे.
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता 21 ऑक्टोबरला निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची घोषणा 21 सप्टेंबरला केल्याने त्याच दिवसांपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली. 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आली. मात्र, आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर, कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार होईल, अशाप्रकारचे फलक कागद व कापडाने झाकण्यात आले. त्यामध्ये शहरातील सर्व राजकीय पक्ष व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नामफलकांचा समावेश होता.
बहुतांशी फलकावरील महत्त्वाचा मजकुर वगळून केवळ राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे नाव दिसू नये, याची खबरदारी घेत, या फलकावरील संबंधित माननीयांचे नाव झाकण्यात आले. बहुतांशी फलकावर ही नावे चिकटपट्टी चिटकवून झाकण्यात आली. मात्र, त्या पट्टया अद्यापही काढण्यात आलेल्या नाहीत.