कोल्हापूर (प्रतिनिधी) – लोक कल्याणकारी राजे श्री. छत्रपती शाहू महाराज यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजितसिंह घाटगे यांनी संस्थान काळात छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून सर्वात मोठे लोकहिताचे कार्य केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे. आणि आणि समाज कार्यास स्फुर्ती मिळावी. या हेतूने आज राधानगरी धरणस्थळी भेट देऊन त्यांच्या कार्यालाच अभिवादन केले. धरणस्थळावरील शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शाहू स्मारकाच्या सुरू असलेल्या कामाचीही माहीती घेतली. वीज निर्मिती केंद्र ,स्वयंचलित दरवाजे व धरण परिसराची पाहणी करून माहीती घेतली.
“जेव्हा या धरणाचे काम पूर्ण होईल तेव्हा माझ्या जीवनाचे कार्य पूर्ण होईल.” असे शब्द ज्या राधानगरी धरणाच्या प्रकल्पाला उद्देशून राजर्षी शाहू महाराजांनी लिहिले. तो धागा पकडत धरणस्थळी भेट देऊन महाराजांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना श्री.घाटगे यांनी आदरांजली वाहिली. शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभारलेले हे धरण त्यावेळचे भारतातील सर्वात मोठे स्वयंचलित धरण होते. त्यामुळे हरित क्रांतीची बिजे रोवली.
यावेळी समरजीतसिंह घाटगे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज यांचे क्रांतिकारी विचार आणि स्फुर्तीदायी चरित्र समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावे. त्यांच्या अलौकिक विचारातून आणि कार्यातून नव्या पिढीला स्फुर्ती मिळावी. आणि राजर्षी शाहू महाराज आणि पिराजीराव महाराज यांनी कोल्हापूर संस्थानचा सर्वांगीण विकासाचा घेतलेला ध्यास, त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आजच्या पिढीला समजावेत. यासाठी माझे प्रयत्न कायम राहणार आहेत.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई, तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, सरचिटणीस विलास रणदिवे, सुहास निंबाळकर, सुरेश कानकेकर आदी उपस्थित होते.
शाहूंच्या कार्याचा वसा आणि वारसा
शेतकरी आणि रयत सुखी व्हावी. कोल्हापुर संस्थान सुजलाम सुफलाम बनावे. हे स्वप्न उराशी बाळगत शाहू महाराज व बापूसो महाराज या दोन्ही भावंडांनी राधानगरी धरणाची बांधणी केली. आज त्यांच्या जयंती निमित्त देशातील सर्वात मोठ्या व कोल्हापूर संस्थानास वरदान ठरलेल्या राधानगरी धरणास भेट दिली. यातून त्यांच्या जनहिताच्या कार्याची व दूरगामी विचारांची प्रचिती राधानगरी धरणाकडे पाहून येते.त्यांच्या समाजकार्याचा मार्ग स्वीकारताना हे पूर्वज व स्व. राजे विक्रमसिह घाटगे यांचा आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच श्री.घाटगे यांची या थोर पुरूषांचा वासा आणि वारसा घेऊन पुढे वाटचल सुरू आहे .
पुढील शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करावी, ग्रामस्थांची मागणी
यावेळी धरणस्थळी येथील स्थानिक ग्रामस्थांनी श्री घाटगे यांच्या या शाहू महाराजांच्या कार्याला सलाम करण्याच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे कौतुक केले. व त्यांच्या या अथांग व चिरंतन कार्यस्थळी त्यांची पुढील जयंती साजरी करावी. अशी मागणी केली. शाहू महाराज यांच्या समाजहिताच्या कार्यास उजाळा मिळावा. आजच्या पिढीला त्याची माहीती व्हावी. या उद्देशाने त्याला शाहू महाराज यांचे वंशज असलेल्या श्री घाटगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.