समाजवादी पक्षाचा आरोप, भाजपा नेत्यांकडून धमक्या येत असल्याचा दावा
लखनौ : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जीविताला असणाऱ्या संभाव्य धोक्याच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेश विधान सभेत विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले. भाजपा नेत्यांकडून धमक्या येत असल्याचा आरोप केला जात आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. मात्र सभापती हरीदय नारायण दीक्षित यांनी ती मंजूर करण्यास नकार दिला. या निर्णयानंतर समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
काही दिवसांपुर्वी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अखिलेश यादव म्हणाले होते की, त्यांना भाजपाच्या धमकीचे फोन आणि संदेश येत आहेत. त्यांच्या एका सभेत एका कार्यकर्त्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर त्यानंतर या धमक्या येण्यास सुरवात झाली आहे. माझ्या जीविताला भाजपाच्या नेत्यांकडून धोका आहे. मला धमकीचे संदेश आणि फोन येत आहेत. मी माझ्या फोनमध्ये हे संदेश जतन केले आहेत. मी लवकरच ते माध्यमांना दाखवणार आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होताच समाजवादी पक्षाने पक्षध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांची वाढती लोकप्रियता पाहून धास्तावलेल्या भाजपाच्या नेत्यांनी त्यांना धमक्या देण्यास सुरवात केली आहे. सर्वोच्च न्यायलयानेही राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा विषय उचलून धरला आहे. जर अखिलेश यादव यांना काही दुखापत झाली तर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत, असे चौधरी म्हणाले.