जोधपूर – काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने सलमान खानला समन्स बजावला असून कोर्टात प्रत्यक्षात उपस्थित न राहिल्यास त्याचा जामीन रद्द केला जाऊ शकतो. मागील वर्षी याच कोर्टाने सलमानला सदर खटल्या प्रकरणी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर सलमान एकाही सुनावनीस उपस्थित राहिला नसल्याने सलमानला कोर्टाने समन्स बजावला आहे.
जर कोर्टाने सलमानचा जामीन रद्द केला तर त्याला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते. त्यामुळे त्याला पुन्हा जेलची हवा खावी लागू शकते. त्यामुळे सलमानची अडचण आता वाढली आहे. 1198 साली हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटींग दरम्यान काळवीट शिकार झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी सलमान खानवर असा आरोप लावण्यात होता की, काकणी गावामध्ये मध्यरात्री सलमानने दोन काळवीटांची शिकार केली होती. हे प्रकरण मागील 20 वर्षांपासून कोर्टात सुरु आहे.
दरम्यान एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहिती नुसार, सीजेएम ग्रामीण कोर्टाने काळवीट शिकार प्रकरणी सहआरोपी सैफ अली खान, नीलम, सोनाली तब्बू आणि इतर आरोपी दुष्यंत सिंह यांना संशयाचा फायदा देत निर्दोष सोडले होते. यानंतर राज्य सरकारकडून राजस्थान हायकोर्टात अपील करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने पुन्हा या सगळ्यांना या प्रकरणी नोटीस बजावली.