सलमान खान सध्या “दबंग-3’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या तिसऱ्या भागाला पूर्वीच्या दोन्ही भागांपेक्षा अधिकच मसालेदार आणि इंटरेस्टिंग बनवण्यासाठी सलमान दिवस-रात्र एक करतो आहे. चुलबुल पांडे हे फेव्ह्ररेट कॅरेक्टर साकारण्याशिवाय तो या तिसऱ्या भागाचा निर्माताही आहे. म्हणूनच सलमान या सिनेमाच्या प्रत्येक पैलूवर बारिक लक्ष देतो आहे. म्हणूनच सलमानने “दबंग-3’चे डायलॉगही स्वतःच लिहीण्याचा निर्णय घेतला आहे.
कन्नड ऍक्टर किच्छा सुदीपने “पहेलवान’ या आगामी कन्नड सिनेमाच्या प्रमोशनच्यावेळी ही माहिती दिली. किच्छा सुदीप हा “दबंग-3’मध्ये खलनायकाचा रोल करतो आहे. आता “दबंग-3’मध्ये चुलबुल पांडे सलमानचेच डायलॉग बोलणार आहे, असे सुदीपने सांगितले. सलमान सेटवर सारखा डायलॉग लिहीत बसलेला असतो. या डायलॉगना तो सतत सुधारतही असतो.
“दबंग-3’ला सलमान आपल्या मुलाप्रमाणे सांभाळतो आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःच्या वेगळ्या सूचनाही देत असतो. याशिवाय त्याला स्वतःच्या निकषांनुसार सिनेमामध्ये बदलही करायला आवडते. सलमानला लिहीण्याची आवड पहिल्यापासूनच आहे. लेखक सलीम खान यांचा पुत्र असलेल्या सलमानने यापूर्वी “वीर’ची कथाही लिहीली होती.