मुंबई – अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश तर अयोध्येतच पर्यायी ५ एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निकालावर आता सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ज्येष्ठ लेखक, निर्माते व अभिनेते सलमान खानचे वडील ‘सलीम खान’ यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. “भारतातील मुस्लिमांना मशिदीपेक्षा शाळेची जास्त गरज आहे. त्यामुळेल अयोध्येत मिळणाऱ्या पाच एकर जमिनीवर शाळा उभारावी. त्यामुळे मुस्लिमांना चांगलं शिक्षण मिळाल्यास आपल्या देशातील अनेक समस्या दूर होतील”. असं सलीम खान म्हणाले.
गेली अनेक वर्षे सुरु असलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं शनिवारी निकाल दिला. त्यामुळे “अयोध्येचा वाद आता संपला असून मुस्लीम समाजाने सर्वकाही विसरुन आता पुढे जायला हवं”, असंही ते म्हणाले.