मुंबई – डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरीसेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचे वित्त नियोजन करणे असो की आनंदवनला “स्मार्ट व्हिलेज’ बनवणे असो, अपंगांसाठी “निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी “युवाग्राम’ उपक्रम राबवणे यासारख्या अनेक उपक्रमात त्यांनी आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवला होता.
डॉ. शीतल आमटे यांनी सोमवारी आत्महत्या केली. ३९ वर्षीय डॉ. शीतल गौतम आमटे-करजगी यांच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नैराश्यातून विषारी इंजेक्शन स्वतःला टोचून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. आनंदवनात डॉ. बाबा आमटे यांच्या समाधीस्थळाजवळ सोमवारी संध्याकाळी दफनविधी करण्यात आला.
दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांच्या जाण्यामुळे समाजात एक मोठी पोकळी निर्मण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी शीतल आमटे यांना श्रद्धांजली वाहिली. यावर मराठी संगीतकार, गीतकार, लेखक आणि गायक सलील कुलकर्णी यांनी सुद्धा फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे. सलील कुलकर्णी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं की, “ताण… मनावर… कोणाचा? परिस्थितीचा? माध्यमांचा? चर्चेचा? एक बुद्धिमान मैत्रीण हकनाक गेली… निःशब्द झालोय. शीतल आमटे का ग? ‘ या आशयाची पोस्ट सलील यांनी केली.
https://www.facebook.com/saleel.s.kulkarni/posts/2429383927207609
दरम्यान, शीतल आमटे यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यांनी सोशल मीडियावर स्वतः काढलेली एक पेंटिंग पोस्ट केली असून यावर २९ नोव्हेंबर २०२० अशी तारीखही आहे. हे पेंटिंग शेअर करताना शीतल आमटेंनी युद्ध आणि शांतता असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमधून शीतल आमटे काही संकेत देत होत्या का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.