मुंबई -बऱ्याच देशांमध्ये कोविडचे रुग्ण वाढत असतानाच महागाई वाढण्याची शक्यता वाढल्यामुळे जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन चार दिवसानंतर निर्देशांकात बरीच घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 91 अंकांनी म्हणजे 0.67 टक्क्यांनी कमी होऊन 14,850 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 340 अंकांनी कोसळून 49,161 अंकांवर बंद झाला.
एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, टीसीएस या निर्देशांकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. या कंपन्याबरोबरच बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, हिंदुस्तान युनिलिव्हर, टायटन या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
मात्र अशा परिस्थितीतही स्टेट बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, पावर ग्रिड, ओएनजीसी, एनटीपीसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, महागाई वाढण्याची शक्यता वाढल्यामुळे जागतिक बाजारात विक्रीचे वारे आहेत. त्याचा संसर्ग भारतीय शेअर बाजारानाही झाला. त्याचबरोबर चीनमधील परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र जागतिक शेअर बाजाराच्या निर्देशांकांच्या तुलनेत शेअर बाजार निर्देशांकांची कमी हानी झाली.
मिड कॅप आणि स्मॉल कॅप वधारले.
सेन्सेक्स व निफ्टी हे मुख्य निर्देशांक कमी झाले असले तरी आज शेअर बजारात छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. त्यामुळे मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.80 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले. आता पर्यंत परिस्थिती सुधारेल म्हणून धातू कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी नफ्याकरिता धातू कंपन्यांची निवड केल्याचे दिसून आले.