नवी दिल्ली – वाहनांची विक्री वाढत असल्यामुळे वाहन कंपन्यांच्या नफ्यात वाढ होऊ लागली आहे. भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादन करणारी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या दुसऱ्या तिमाहितील नफ्यात दोन टक्क्याची वाढ झाली.
या तिमाहीत कंपनीला 1,419 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येईल याबाबत कंपनी आशावादी आहे. कंपनीचा महसूल दहा टक्क्यांनी वाढून 18,755 कोटी रुपये इतका झाला आहे. मार्च महिन्यानंतर लॉक डाऊनमुळे कंपनीच्या बऱ्याच प्रकल्पातील काम करणे बंद झाले होते. मात्र आता खबरदारीच्या उपाययोजना करून कंपनीच्या सर्व प्रकल्पातील उत्पादन सुरू झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
लवकरच वाहन क्षेत्रातील इतर कंपन्या आपले ताळेबंद जाहीर करण्याची शक्यता आहे. या ताळेबंदात परिस्थिती सुधारली असल्याचे दिसून येईल असे विश्लेषकांनी सांगितले.
सध्या वाहनांचे दर जास्त आहेत. त्यामुळे काही काळ तरी सरकारने वाहनावरील जीएसटी कमी केल्यानंतर त्याचा अर्थव्यवस्था सुधारण्यास लाभ होईल असे वाहन कंपन्यांनी म्हटले आहे.