नवी दिल्ली – जागतिक बाजारात तेलाचे दर वाढले किंवा पुरवठ्यावर परिणाम झाला तर अर्थव्यवस्थेला धक्का बसू नये, याकरीता भारत सरकारने कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात राखीव साठा करून ठेवला आहे. आता सरकारने बदललेल्या धोरणानुसार ही साठवणूक यंत्रणा काही प्रमाणात खासगी कंपन्यांना लिजवर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे या राखीव साठ्यातील बरेच तेल तेल शुद्धीकरण कंपन्यांना विकण्याचे काम चालू आहे.
साठवणूक यंत्रणा विकसित करण्यासाठी भारताने आयएसपीआरएल ही कंपनी स्थापन केलेली आहे. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच पी एस अहुजा यांनी सांगितले की, आम्ही राखीव साठ्यातील तेल विक्री सुरू केली आहे. मंगळुरू येथील साठवणूक केंद्रातून आतापर्यंत तीन लाख टन कच्चे तेल तेलशुद्धीकरण कंपन्यांना देण्यात आले आहे. लवकरच उरलेले साडेचार लाख टन तेल विकण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी तेलाचे दर प्रचंड कमी असताना या कंपनीने हे तेल तेव्हाच्या बाजार भावावर विकत घेतलेले आहे. विझाग येथील तेल साठवणूक केंद्रातुनही एक लाख टन तेल एचपीसीएल या कंपनीला विकण्यात आले आहे. या अगोदर तेल साठवणूक केंद्र सरकार करीत होते. मात्र आता या धोरणामध्ये बदल करण्यात आला असून साठवणूक केंद्रातील 50 टक्के भाग खासगी कंपन्यांना तेल साठविण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
सरकार मालामाल
तेल साठवणूक केंद्रातील तेलाची खरेदी सरकार कडून गेल्यावर्षी तेलाचे दर कमी असताना करण्यात आली होती. त्या वेळी तेलाचे दर केवळ 19 डॉलर प्रति बॅरल होते. आता 80 डॉलरच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला या तेल विक्रीतून मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. भारताकडे सध्या तीन तेल साठवणूक केंद्रे आहेत. आणखी दोन केंद्रे विकसित करण्यात येत आहे. सध्या या साठवणूक केंद्रांमध्ये दहा दिवस पुरेल एवढा तेल साठा आहे. त्यामध्ये आणखी बारा दिवसाची भर पडणार आहे.