जीनेव्हा – जम्मू-काश्मीरबाबत अकारण पुळका दाखवणाऱ्या आणि जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर काश्मीरचे तुणतुणे वाजवणाऱ्या पाकिस्तान सरकारचा बुरखा फाडला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना पाकिस्तानकडून जनावरासारखी वागणूक दिली जाते असा थेट आरोपच यासंदर्भात करण्यात आला आहे.
गिलगीट बाल्टिस्तानला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याकरता पाकिस्तान उतावीळ झाला आहे. मात्र त्यापूर्वीच व्याप्त काश्मिरातील मानवाधिकार कार्यकर्ते सज्जाद राजा यांनी पाक सरकारवर जोरदार टीका करताना त्यांच्या लोकांवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा थेट संयुक्त राष्ट्रांसमोर उपस्थित केला आहे. व्याप्त काश्मिरात राहणाऱ्या नागरिकांना जनावरासारखी वागणूक दिली जात असून या लोकांना घटनात्मक अधिकार दिले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या 45 व्या सत्रात बोलताना नॅशनल इक्वॅलिटी पक्षाचे अध्यक्ष असलेले सज्जाद राजा म्हणाले की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये राहणारे आम्ही नागरिक विनंती करतो की पाकिस्तानकडून आम्हाला दिली जाणारी हीन वागणूक थांबवावी. त्यांच्या नव्या निवडणूक कायद्याने आमचे सगळे घटनात्मक आणि राजकीय अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आम्हाला पाकिस्तानात समाविष्ट व्हायचे नसून या विरोधातील आमच्या सगळ्या मागण्यांना देशविरोधी ठरवले जाते आहे. मुळात त्यांची हीच भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाच्या विरोधात आहे.
व्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या व्यथा सांगताना राजा यांच्या डोळ्यात पाणीही आले. आमच्या घराची रक्षा करत असल्याबद्दल आम्हालाच गद्दार म्हटले जाते आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यास पाक लष्कराला पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन्ही बाजूच्या युवकांची माथी भडकावण्याच्या प्रकारातच पाकिस्तान सरकार गुंतले आहे. भारताविरुद्धच्या भ्याड युद्धात या युवकांचा चारा म्हणून वापर केला जातो आहे. तसेच पाकिस्तान अजूनही व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.