देहूगाव – आषाढी एकादशी सोहळा। विठ्ठल म्या देखियला डोळा।। करोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शासकीय नियमांचे पालन करत, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरीकडे गेला होता. एकादशी, बारस आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी परतीच्या मार्गाने निघाली. हा पालखी सोहळा देहूनगरीत शनिवारी (दि. 24) रात्री साडे अकराच्या सुमारास पोहचला. भाविकांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केले.
पालखी सोहळ्याने 1 जुलै रोजी (गुरुवारी) मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवले होते. मात्र यंदा करोनामुळे प्रस्थानानंतर महाराजांच्या पादुका मंदिरामध्येच विसावल्या. पायी वारीतील प्रतिदिनाचे नित्यनेमाची कार्यक्रम मुख्य मंदिरात होत होती. एकादशीच्या एक दिवस अगोदर पालखी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
आषाढीवारी पूर्ण करून सुमारे 35 दिवसांच्या प्रवासानंतर दरवर्षी पालखी देहूत येत असते. यंदा एकादशीनंतर चौथ्या दिवशी शिवशाहीने पालखीचे देहूत आगमन झाले.
आषाढी एकादशी दिनी पंढरपूरमध्ये विधिवत धार्मिक कार्यक्रम झाला. त्यानंतर पालखी सोहळा पौर्णिमेच्या दिवशी पंढरपूर प्रदक्षिणा करून विठुरायाच्या दर्शनानंतर परतीच्या मार्गाने निघाले. पौर्णिमादिनाचे विविध धार्मिक कार्यक्रम पूर्ण करत देहूत पालखी सोहळयाचे रात्री साडेअकराच्या सुमारास पुनरागमन झाले.