मुंबई – चीनमधील बंदरामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून जहाजावर अडकून पडलेले 23 भारतीय खलाशी आज मायदेशी परतले. कोचीन विमानतळावर हे सर्व खलाशी परत आले, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
करोनाच्या साथीमुळे चीनमध्ये प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्याने एमव्ही जग आनंद या जहाजाला गेल्या वर्षी 13 जूनपासून चीनमधील जिंगतांग बेटावरच नांगर टाकून थांबावे लागले होते. जहाजावरील कर्मचाऱ्यांना स्थानिक प्रशासनाने बाहेर जाऊ दिले नव्हते. तसेच या जहाजावरील कर्मचाऱ्यांची 7 महिन्यांपासून अदलाबदलीही करू दिली नव्हती.
त्यामुळे जहाजावरील खलाशांना तब्बल 7 महिने जहाजावरच अडकून पडावे लागले होते. “नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया’ आणि “मेरीटाईम युनियन ऑफ इंडिया’ या दोन संघटनांनी या खलाशांना पुन्हा भारतात आणण्याचा पाठपुरावा केला होता.
हे खलाशी कोचीन विमानतळावर उतरल्याबद्दल त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. खलाशांच्या परतीबाबत दोन्ही संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. खलाशांना परत आणण्याबद्दल केलेल्या सहकार्याबद्दल जहाज मंत्री मनसुख मांडवीय, जहाज उद्योग महासंचालक अमिताभ कुमार. इंटरनॅशनल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स फेडरेशन, ग्रेट इस्टर्न शिपींगला खलाशांच्या कुटुंबीयांनी धन्यवाद दिले आहेत.