विरोधकांचे “कदम’ मागे; 28 तारखेला होणार चित्र स्पष्ट
सुरेश डुबल
कराड – सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून 9 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील हे आता कॅबिनेट मंत्री झाल्याने विरोधकांनी लढाई सुरू होण्यापूर्वीच आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. त्यांचे “कदम’ मागे पडले आहेत. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या नादाला लागण्याऐवजी आपले आहेत, तेच कारखाने सांभाळलेले बरे, अशी विरोधकांची भूमिका असावी.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित साखर कारखाना आहे. सहकार मंत्रिपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारलेले बाळासाहेब पाटील यांची या कारखान्यावर एकहाती सत्ता आहे. एखाददुसरा अपवाद वगळता सह्याद्री कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत आहे. 2015 मध्ये धैर्यशील कदम यांनी कारखान्याच्या निवडणुकीत शड्डू ठोकला होता. कराड उत्तर मतदारसंघाचा आमदार व्हायचे असेल तर “सह्याद्री’ सर करणे नितांत गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन धैर्यशील कदम यांनी यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलमधून काही ठिकाणी आपले शिलेदार आ. बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलच्या विरोधात उभे केले होते. मात्र,निवडणुकीत कदमांच्या पॅनेलचा सुपडा साफ झाला होता. सभासदांनी आ. बाळासाहेब पाटील यांनाच कौल दिल्याने पुन्हा त्यांनीच सत्ता मिळवली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 2014 प्रमाणेच तिरंगी लढत झाली. राष्ट्रवादीच्या आ. बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने धैर्यशील कदम यांना उभे केले.कदमांना तिकीट दिल्याने नाराज झालेले भाजपचे नेते मनोज घोरपडे यांनीही अपक्ष म्हणून दंड थोपटत आखाड्यात उडी घेतली. मात्र, या निवडणुकीतही आ. बाळासाहेब पाटील हे 48 हजारांहून अधिक मते मिळवून विजयी झाले. मात्र, बाळासाहेब पाटील हे फक्त आमदार असते तर सह्याद्री कारखान्याची यंदाची निवडणूकही निश्चितपणे दुरंगी वा तिरंगी झाली असती. मात्र, राजकारणात कधीही काहीही होऊ शकते.
आ. बाळासाहेब पाटील कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यांना सहकारी साखर कारखानदारीशी निगडीत सहकार व पणन ही खाती मिळाली आहेत. त्यांनी मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच सह्याद्री कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. ना. बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खाते असल्याने आता त्यांच्या नादाला न लागलेले बरे, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. त्याची सुरुवात मनोज घोरपडे यांच्या माघारीने झाली. मात्र, 2015 च्या निवडणुकीत ना. पाटील यांना विरोध करणाऱ्या धैर्यशील कदम यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली. त्यांनीही पुढील राजकारणाचा अंदाज घेऊन कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपल्या गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
कारखान्याची निवडणूक असो की विधानसभेची, विरोध करण्यात काहीच गैर नाही; परंतु सहकार मंत्र्यांच्या कारखान्याची निवडणूक त्यांच्या विरोधात लढवणे सोप नाही आणि सयुक्तिकही नाही. स्वतःचे खाजगी कारखाने असताना, आपल्याच पायावर दगड मारून घेण्यापेक्षा माघार घेतलेली बरी, हेच ओळखून दोन्ही प्रमुख विरोधकांनीही सह्माद्रीची निवडणूक न लढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असेच सध्याचे चित्र आहे.
निवडणुकीत 167 उमेदवारी अर्ज
सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतून मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांच्या गटांनी माघार घेतली असली तरी निवडणुकीत दहा गटांमधील 21 जागांसाठी तब्बल 167 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 28 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यावेळीच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.