प्रभारी उपविभागीय अधिकारी पवार यांची आढावा बैठकीत माहिती
आळंदी – आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा बुधवार (दि. 20) ते मंगळवार (दि. 26) या कालवधीत पार पडणार आहे. यासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा आणि भाविक नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी तथा खेडचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अजय पवार यांनी केल्या.
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी पालिकेच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पवार बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत अलसटवार, तहसीलदार सुचित्रा आमले, आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर, प्रकाश जाधव, विवेक लवांड, वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, सागर भोसल आरोग्य अधीक्षक जी. जी. जाधव, संदीप गोरे, कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, रामराव खरात आदीं उपस्थित होते.
या बैठकीला विविधा विभाग प्रमुख यांनी तयार केलेला यात्रा पूर्व आढावा दिला. कार्तिकी सोहळ्यात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी शासकीय खात्यांनी नियोजन केले.त्या प्रमाणे कामकाज करण्यास सांगण्यात आले. यावेळी पवार यांनी माहिती घेत संबंधितांना त्याप्रमाणे सूचना केल्या.
मरकळ-आळंदी रस्त्यावर सुयश मंगल कार्यालया पुढे पाणी येत असल्याने रस्ताखड्डे खराब झाला असल्याने दुरुस्तीची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी बैठकीत केली. आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, इंधन सेवा, स्वच्छता, स्वच्छतागृहांची सुविधा नेहमीप्रमाणे ठेवली जाणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. 24 तास आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणार असल्याचे संदीप गोरे यांनी सांगितले. यावेळी आळंदी देवस्थान, दिंडी समाज, पदाधिकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. आळंदीच्या दर्शनबारी कामास जागा देण्याची मागणी प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केली.
- कार्तिकवारीतील ठळक मुद्दे –
- पदपथ भाविकांसाठी खुले करणार – भूमकर
- तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बांधण्यात आलेली सुमारे चारशे सुलभ शौचालये यात्रा काळात भाविकांना मोफत
- वापरू द्या- नगराध्य उमरगेकर यांची अजय पवार यांच्याकडे मागणी
- मंदिर परिसर, इंद्रायणी घाट व शहरात असणाऱ्या प्रमुख चौका चौकात सीसीटिव्ही बसविणार
- शहरातील सर्व अतिक्रमणे येत्या दोन दिवसांत काढण्यास सुरुवात करणार – भूमकर
- यात्रा काळात दिंडीकरी (पासधारक), पाण्याचे टॅंकर, घंटा गाड्या व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाईल – चौधर
“राम मंदिराच्या निकालामुळे सतर्क राहा’
भाविक-ग्रामस्थांना सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व विभागणी तसेच नागरिकांनी 370 कलम वातावरण व येवू घातलेला राम मंदिराचा निकाल या पार्श्वभूमीवर सतर्क राहवे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी केले.