चेन्नई – भारतीय संघाचा अव्वल ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विन याने आयपीएलमधील चेन्नई संघाने मला संघातून वगळले होते त्याचे दुःख मला आजही वाटते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
2010 सालच्या आयपीएल स्पर्धेत अखेरच्या दोन सामन्यात माझी कामगिरी खराब झाली. त्यातही शेवटच्या सामन्यात माझ्या गोलंदाजीवर खूप धावा काढल्या गेल्या. बेंगळुर संघाच्या मार्क बाऊचर व रॉबिन उथप्पा यांनी खूप आक्रमक फलंदाजी केली. त्यांना बाद करण्यात तसेच रोखण्यात मला अपयश आले त्यामुळे मला संघातून बाहेर काढले गेले. आंतरराष्ट्रीय सामन्यांत माझी कामगिरी त्या मोसमात सरस झाली होती. मात्र, त्या दोन सामन्यातील कामगिरी खूपच सुमार झाली व त्यामुळे मला संघातील स्थान गमवावे लागले. अर्थात त्याचे आजही वाईट वाटते, असेही अश्विनने व्यक्त केले.
सध्या करोनाचा धोका कायम असल्याने यंदाच्या मोसमातील आयपीएल अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याने मी निराश झालो. माझी कामगिरी पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी मला खरेतर स्पर्धेतील कामगिरीबाबत खूप आशा होत्या. मात्र, आता स्पर्धा कधी होणार ते देखील कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे या स्पर्धेत सरस कामगिरी करुन पुन्हा एकदा मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये मला संघात स्थान मिळेल हे स्वप्न कधी पूर्ण होणार याची आता मला चिंता वाटत असल्याचेही अश्विन म्हणाला.
चेन्नई सुपरकिंग्जने संघातून रिलीज केल्यानंतर अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आयपीएलमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर यंदा झालेल्या लिलाव प्रक्रियेत पंजाबने मला रिलीज केले व दिल्ली कॅपीटल संघाने मला संघात घेतले. तेव्हापासून मी आयपीएल कधी सुरु होईल याची प्रतीक्षा करत होतो पण करोनाचा धोका वाढला आणि अनेकांप्रमाणेच माझेही स्वप्न अपूर्ण राहिले, असेही अश्विनने सांगितले.