मुंबई : राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु असलेल्या संघर्षात रोजच कोणत्या ना कोणत्या नेत्याकडून शाब्दिक हल्ला करण्यात येत आहे. त्यातच आता बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविषयी हे वक्तव्य असून त्यात त्यांची अडचण होणार असल्याचे म्हटले जात आहे. आदित्य ठाकरे कधी पोलीस ठाण्याची पायरी चढले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. एवढंच नाहीतर सचिन वाझे दर महिन्याला ‘मातोश्री’वर 100 खोके पाठवायचा, असा गंभीर आरोपही त्यांनी ठाकरेंवर केला आहे.
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “50 खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असत.” शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरेंवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये रोज वेगवेगळ्या कारणांवरुन आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यातच ठाकरे समर्थकांच्या ’50 खोके एकदम ओके’ या घोषणेला प्रत्युत्तर देत प्रतापरावांनी ‘शंभर खोके एकदम ओके’ असे म्हणत ठाकरेंना थेट आव्हानच दिले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या पार पडल्यानंतर गुलाबराव पाटील बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आले होते. त्यावेळी रॅली काढून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरेंवर आगपाखड केली आहे.
दरम्यान, शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. आधीच दसरा मेळाव्यावरुन ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये जुपल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता प्रतापराव जाधवांच्या आरोपानंतर पुन्हा शिवसेना आणि शिंदे गटात नव्या वादाला सुरुवात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.