मुंबई – आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सला यंदा जे अपयश पाहावे लागले, त्याला काय कारणे आहेत, त्यावर चर्चा सुरू असली तरीही संघात सर्वकाही अलबेल नव्हते हे मात्र, स्पष्ट दिसून आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याला एकाही सामन्यात संधी का दिली गेली नाही, असा प्रश्न आता ऐरणीवर आला असून मुंबईच्या क्रिकेटमधील काही दिग्गजांनी सचिनचे महत्त्व कमी करण्यासाठीच रोहित शर्माच्या खांद्यावरून निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अर्जुनला संधी देण्यासाठी गेल्या मोसमातही बरीच फिल्डिंग सचिनने लावली असल्याचे सांगितले जाते. त्यानेच मुंबई इंडियन्सच नव्हे तर मुंबई क्रिकेट संघटनेतील आपले वजन त्यासाठी लावल्याचेही बोलले गेले. खुद्द कोणीही पुढे येत यावर अधिकृत वक्तव्य केले नसले तरी आपल्याच मुलाच्या बाबतीत सचिन सर्व पर्याय वापरणार हे स्पष्ट होते.
अर्जुनला एकही संधी नाही
मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहितने प्रत्येक पराभवांनतर संघात बदल केले. मात्र, संपूर्ण 14 सामने झाल्यावर अर्जुनला एकाही सामन्यात का खेळवले गेले नाही याचे कोणतेही समाधानकारक उत्तर त्याच्याकडे तसेच संघ व्यवस्थापनाकडे नव्हते याचे आश्चर्य वाटते.
गेल्या मोसमात त्याला खेळवले गेले नाही; पण यंदाच्या मोसमात त्याला त्याच्या 20 लाख बेसप्राईसवरून 30 लाख रुपयांत मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतले. मात्र, सलग पराभव झाल्यावरही त्याला एकाही सामन्यात खेळवले गेले नाही. यामागे कोणाचा हात आहे, हे समोर आले नसले तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मुंबईच्या क्रिकेटमध्ये सचिनचे वाढते महत्त्व व निर्णयांवर त्याचे असलेले नियंत्रण साफ जाणवू लागले होते. त्यामुळेच त्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी अर्जुनचा वापर केल्याचीही चर्चा आहे.