मुंबई – “राज्यात खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सर्व बाबतीत घसरणच सुरू आहे. राज्यकर्ते कितीही सकारात्मक वगैरे वातावरणाचे दावे करीत असले तरी राज्यात त्याच्या विपरीतच घडत आहे. उद्योग-व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. गोवरची साथ आटोक्यात आलेली नाही. शेतकरी आधी अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात सापडला होता. आता तो मिंधे सरकारच्या तावडीत सापडला आहे.” अशा कडक शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.
“खरीपाचे पीक महापुरामुळे उद्वस्त झाले. शेतकऱ्याने मोठया उमेदीने रब्बीचा हंगाम फुलविला आहे. मात्र महावितरण नावाची टोळधाड रब्बीचे पीकही उद्वस्त करीत आहे. सरकार म्हणते, फुकाच्या गप्पा मारीत नाही. वीज बिल थकबाकीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही.महावितरण म्हणते, वीज बिल भरा, नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू.मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार हा असा सुरू आहे. या कारभाराच्या कचाटयात सापडलेल्या बळीराजाने जगायचे कसे? नगर जिल्हयातील पोपट जाधव या शेतकऱ्याची आत्महत्या ही महावितरण नावाच्या पठाणी टोळीने घेतलेला बळी आहे. खोके सरकार त्याचे प्रायश्चित्त घेणार का, हाच प्रश्न आहे.” अशा कडक शब्दात सामनामधून सत्ताधाऱ्यांना सुनावण्यात आले आहे.
शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळू नये
“नगर जिल्हयातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव यांनी सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. वीज बिलाच्या थकबाकीचे कारण देत महावितरणने पोपट जाधव यांचे वीज कनेक्शन तोडले होते. वीज नसल्याने शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकाचे नुकसान ते पाहू शकले नाहीत. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आणि स्वतःला संपवून घेतले. शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत. वीज बिलाची थकबाकी हा सरकारसाठी प्रश्न असला तरी त्याचे उत्तर तुम्ही बळीराजाच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवून मिळविणार आहात का?” असा सवाल देखील यावेळी अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.