नवी दिल्ली – भारताचा माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने आपण कधीही आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केले नाही, असे म्हटले आहे. मी हे फक्त 10 लाख रुपयांसाठी का करेन?, असा सवालही केला आहे.
2013 साली श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सच्या दोन क्रिकेटपटूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणात भारतीय क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला होता.
मला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक महत्त्वाची मालिका खेळायची होती आणि कारकीर्द संपवण्याचे कोणतेही कारण नव्हते. मी इराणी करंडक खेळलो आणि दक्षिण आफ्रिका मालिका खेळण्यास उत्सुक होतो. ती मालिका खेळणे हे माझे लक्ष्य होते. मग त्यावेळी फिक्सिंगसारखे कृत्य का करू आणि तेही केवळ 10 लाखांसाठी? जेव्हा मी पार्टी करायचो तेव्हा माझ्याकडे जवळपास 2 लाखांची बिले असायची. मग असे का करू, असेही त्याने म्हटले आहे.
चाहत्यांच्या आणि हितचिंतकांच्या पाठिंब्यामुळेच मी या आरोपांतून बाहेर येऊ शकलो. मी त्यावेळेस वैयक्तिक देणी रोख स्वरूपात नाही, तर कार्डद्वारे करायचो. जर माझ्याकडे इतकी रोख रक्कम असती, तर मी ती वाटली असती. खरं तर मी एका सामान्य कुटुंबातून आलो आहे.
ज्या षटकात मी फिक्सिंग केल्याचे आरोप माझ्यावर झाले त्या षटकात 14 पेक्षा जास्त धावा द्याव्या लागणार होत्या. माझ्या त्या षटकात 4 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा दिल्या. तेथे नो बॉल, वाइड आणि स्लो बॉल नव्हते. माझ्या अंगठ्यावर शस्त्रक्रिया करूनही मी 130 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होतो. मी कधीही गैरकृत्य केले नाही, असेही तो म्हणाला.
श्रीशांतसह चंडिला आणि चव्हाणही होते दोषी
हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा श्रीशांत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. आरोपानंतर अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या दोन खेळाडूंना श्रीशांतसह अटक करण्यात आली. आरोपातून मुक्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2019 साली श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवली.