मुंबई- अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे प्रसिद्ध पार्श्वगायक ‘एस.पी. बालासुब्रमण्यम’ यांची शुक्रवारी (दि. 25) प्राणज्योत मालवली. चैन्नईतील एमजीएम हेल्थकेअर या रुग्णालयात बालासुब्रमण्यम यांनी अखेरचा श्वास घेतला. आवाजाचा जादूगार असलेले बालसुब्रमण्यम यांनी तेलगू, तामिळ, कन्नड, हिंदी, मल्याळम अश्या अनेक भाषांमध्ये जवळपास 40,000 गाण्यांना आपला आवाज दिला आहे.
दरम्यान, बालसुब्रमण्यम यांच्या अचानक जाण्याने भारतातील चाहत्यांनाच नव्हे, तर जगभरातील मोठ्या कलाकारांना दुःख झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी एस.पी. बालासुब्रमण्यम यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच ‘भारतरत्न’ देऊन, त्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात यावा अशी विनंती केली आहे. या संदर्भात जगनमोहन रेड्डी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र सुद्धा लिहिले आहे.
Thank you Honourable CM of Andhra Pradesh. @AndhraPradeshCM.
The honour you seek for our brother Shri.S.P.Balasubramaniam is a sentiment which true fans of his voice will echo, not only in Tamilnadu but throughout the whole nation. pic.twitter.com/eSeC4MnR8p
— Kamal Haasan (@ikamalhaasan) September 28, 2020
जगनमोहन रेड्डी यांनी म्हंटलं कि, “आंध्र प्रदेशच्या नेल्लूरमध्ये या प्रतिभावान गायकचा जन्म झाला. तब्बल पाच दशकांचे त्यांचे करिअर संगीत विश्वाचा अविभाज्य आहे. मरणोत्तर ‘भारतरत्न’ ही त्यांच्या योगदानप्रति खरी श्रद्धांजली असेल. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाकृती अलौकिकतेच्या पलीकडच्या आहेत. आपल्या अद्वितीय प्रतिभेने बालासुब्रमण्यम यांनी त्यांच्या कलाकृतींना उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या जाण्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्राचीही हानी झाली आहे. असं ते पत्रात म्हणाले.
दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या या मागणीला जेष्ठ अभिनेता ‘कमल हसन’ यांनी देखील पाठिंबा दिला आहे. कमल हसन यांनी सोशल मीडियावर एक शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.