नवी दिल्ली – युक्रेनमध्ये सुरू असणारे युध्द आणि त्याचा भारतावर होणारा परिणामांवर विचार करण्यासाठी युध्द सुरू होऊन 18 दिवस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दुपारी ज्येष्ठ मंत्री आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक रविवारी घेतली.
या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल, मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा, संरक्षण सचिव अजय कुमार, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांचा समावेश होता.
युक्रेनवरील युध्दाने जागतिक स्थितीवर होणारा परिणाम आणि भारताची सुरक्षा सज्जता यांचा विचार करण्यासाठी ही बैठक निमंत्रित करण्यात आली होती. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून भारताची प्रमुख चिंता त्या देशात अडकलेल्या 20 हजार नागरिकांची सुटका करण्याची होती. त्यातील अनेक जण शेजारील देशांच्या सीमांवर अडकले होते. त्यातील बहुतांश जण हे वैद्यकीय शिक्षण घेणअरे विद्यार्थी होते.
भारताला पुरवटा होणाऱ्या शस्त्रांचा मुख्य पुरवठा रशियाकडून होतो. संरक्षण मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात तीनही संरक्षण दलाच्या प्रमुखांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढवा घेतला होता. तसेच रशियाकडून आयात होणारी शस्त्रे, त्याचा पुरवठा आणि सुट्या भागाचा साठा याचीही माहिती घेतली होती. त्यात त्यांनी शस्त्रांच्या देखभालीची माहिती घेतली होती.