जगातील सर्वांत श्रीमंत कोण, या प्रश्नाचं उत्तर ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा आहे तो असं रुढार्थानं मानलं जात असलं तरी मानसशास्त्रीयदृष्ट्या ज्याला सर्वाधिक मित्र आहेत तो जगातील सर्वांत श्रीमंत आणि आनंदी होय! यावरूनच मैत्री या संकल्पनेची गरज आणि ताकद लक्षात येते.
आपल्याला मित्र का हवे असतात, या प्रश्नाचा मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून आणि मेंदूविज्ञानाच्या दृष्टीने विचार करता अनेक पैलू उलगडतात. असे म्हणतात की, मित्रांमुळे आपले आयुर्मान वाढते. डिप्रेशन दूर होते. निरोगी किंवा हेल्दी राहण्यासाठी सकस अन्न, व्यायाम, चांगली जीवनशैली यांबरोबरीने मैत्रीही खूप मोठी भूमिका निभावत असते. “फ्रेंडशिप डे’च्या निमित्तानं मैत्रीची ही शास्त्रीय बाजूही जाणून घेऊया…
रो दोस्ती बडी ही हसीन है,
ये ना हो तो क्या फिर
बोलो ये जिंदगी है…
या गाण्यानं लाखो तरुण-तरुणींना वेड लावणाऱ्या केके या गायकाच्या स्मृती जागवत यंदाचा फेंडशिप डे अर्थात मैत्रीदिन साजरा होणार आहे. ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार मैत्रीच्या नावानं सेलिब्रेट करण्याच्या परंपरेला 60-70 वर्षांचा इतिहास आहे. उपलब्ध माहितीनुसार हा दिवस “फ्रेडशिप डे’ म्हणून साजरा होण्यामागे तीन कहाण्या आहेत. यातील पहिल्या कहाणीनुसार, हा दिवस सुरू करण्याचे श्रेय एका व्यापाऱ्याला जाते. 1930 मध्ये जोएस हॉल नावाच्या एका व्यापाऱ्यानं असं ठरवलं की, वर्षातून एक दिवस सर्व मित्रांनी परस्परांना शुभेच्छापत्र द्यायची आणि हा दिवस संस्मरणीय बनवायचा. यासाठी त्यानं 2 ऑगस्ट हा दिवस निवडला. त्यानंतर युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये मैत्रीदिन साजरा केला जाऊ लागला.
दुसऱ्या कहाणीनुसार, 20 जुलै 1958 रोजी डॉ. रमन आर्टिमियोने एका डिनर पार्टीचे आयोजन करून मैत्रीदिन साजरा करण्याचे ठरवले. पराग्वेमधील या घटनेनंतर जगभरात फ्रेंडशिप डे साजरा करण्याकडे लक्ष वेधलं गेलं. तिसऱ्या कहाणीनुसार, या दिवसाची सुरुवात 1935 मध्ये अमेरिकेत झाली. तत्कालीन अमेरिकन सरकारने ऑगस्टच्या पहिल्या दिवशी एका व्यक्तीची हत्या केली. ही वृत्त समजल्यानंतर त्याच्या मित्रानं आत्महत्या केली. त्यानंतर बराच गदारोळ झाला आणि तेव्हापासून ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली.
मैत्रीदिनाचा इतिहास काहीही असो, पण मैत्रीचं नातं हे हजारो वर्षांपासून चालत आलेलं आहे. कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीच्या उदाहरणाची उजळणी आजही घराघरांमध्ये केली जाते. राजकारणातल्या मैत्रीविषयीची असंख्य उदाहरण भारतात आणि महाराष्ट्रात आपण पाहात आलो आहोत. त्यामुळे फ्रेंडशिप डेचा इतिहास काहीही असो, त्यानिमित्तानं आपल्या जीवाभावाच्या मित्राला त्याच्याशी असणाऱ्या मैत्रीप्रतीच्या भावना व्यक्त करण्याची संधी यामुळे मिळाली ही खूप मोठी बाब आहे.
आपल्याला मित्र का हवे असतात, या प्रश्नाचा मानसशास्त्रीय परिप्रेक्ष्यातून विचार करता अनेक पैलू उलगडतात. असे म्हणतात की, मित्रांमुळे आपले आयुर्मान वाढते. निरोगी किंवा हेल्दी राहण्यासाठी सकस अन्न, व्यायाम, चांगली जीवनशैली यांबरोबरीने मैत्रीही खूप मोठी भूमिका निभावत असते. मित्र आपल्याला सक्रिय राहण्यास मदत करतात. जीवनाविषयीचे स्वारस्य कायम राखण्याचे काम मैत्रीमुळे होते. आयुष्यात मित्रच नसतील तर जगणं नीरस होऊन जाईल.
काही अभ्यासकांच्या मते, जगातील सर्वांत जुने मानवी नाते हे मैत्रीचे आहे. कुटुंब आणि कुटुंबनिर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या शरीरसंबंधांची गरजही मैत्री आणि मित्रांनंतर आहे. 2011 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, मानवी मेंदूतील ज्या रसायनांमुळे आपल्याला अनेक गोष्टी आवडू लागतात ते रसायन स्रवण्यामध्ये मित्रांची मोठी मदत होत असते. कदाचित म्हणूनच या भूतलावर एकही व्यक्ती असा शोधून सापडणार नाही ज्याला मित्र नसतील! मित्र निवडण्यासाठी भलेही काही कौशल्ये वापरली जात असतील; पण निरंतन टिकणारी मैत्री ही सहजभावाने होते. ती एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे. ती सक्तीनं होत नाही. त्यामुळेच जगातील सर्वांत श्रीमंत कोण? या प्रश्नाचं उत्तर मानसोपचारतज्ज्ञ “ज्याच्याकडे सर्वाधिक मित्र आहेत तो’ असं देताना दिसतात.
2016 मध्ये काही संशोधकांना असे आढळून आले की, जेव्हा दोन मित्र आपापसांत संवाद साधतात, गप्पा मारतात किंवा एकमेकांविषयी विचार करतात, भांडतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिटॉसिनची निर्मिती होते. मैत्री मेंदूतील एका अशा भागाला चेतना देते ज्यामुळे आपण असंख्य ताणतणाव असतानाही मित्रांसोबत अत्यंत आनंदाने राहू शकतो. डॉ. लॉरेन ब्रेंट या वैज्ञानिकांच्या मते, मैत्रीची भावना ही मानवाच्या विकासवादी परंपरेचा एक भाग आहे. कारण मानव हा समाजशील प्राणी म्हणून ओळखला जातो. उत्क्रांत होण्यापूर्वी मानव जेव्हा माकड म्हणून अस्तित्वात होता तेव्हाही तो समूहात राहात होता आणि हा समूह मित्रांचाच असायचा. त्यामुळेच आजही माणूस आपल्याला होणारा प्रत्येक आनंद हा समूहाबरोबर साजरा करण्याला प्राधान्य देतो. एकाकीपणात अथवा एकटेपणात या आनंदाचा अनुभव फारसा घेता येत नाही. तात्पर्य, मैत्रीची प्रक्रिया ही मानवी अस्तित्वात अंतर्भूतच आहे. आपण मैत्री करायला शिकत नाही, कारण आपल्या गुणसूत्रांमध्ये ती अव्यक्त संकल्पना दडलेली आहे.
असे असले तरी काही मानववंशशास्राच्या अभ्यासकांच्या मते, मैत्री या संकल्पनेची बीजे असुरक्षिततेत दडलेली आहेत. प्राचीन मानवी इतिहासात जवळपास एक लाख वर्षे मानव भयानक हिंस्र श्वापदांनी भरलेल्या जंगलात वास्तव्यास होता. साहजिकच तेव्हा जीवनाविषयीची जोखीम सदोदित असायची. प्रत्येक क्षणाला असुरक्षिततेची भावना असायची. या असुरक्षिततेतूनच मैत्रीचा जन्म झाला.
आता आधुनिक अभ्यासानुसार, डिप्रेशन किंवा नैराश्य दूर करण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी मित्रांची संख्या वाढवा, असा सल्ला दिला जातो. प्रोसिडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटीच्या जर्नलमध्ये काही वर्षांपूर्वी एक संशोधन अभ्यास प्रसिद्ध झाला होता. त्यासाठी डिप्रेशनची लक्षणे असणाऱ्या 2000 विद्यार्थ्यांवर संशोधन करण्यात आले होते. त्यांच्या निरीक्षणातून असे दिसून आले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मित्रांची संख्या वाढत गेली त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे हळूहळू कमी होत गेली.
एनल्स ऑफ बिहेव्हियरल मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार मैत्रीचे वर्तुळ आपल्याला आनंदी ठेवण्यामध्ये सर्वोच्च भूमिका बजावते. ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, मित्रांची साथ आपल्याला खासगी आयुष्यातच नव्हे तर कार्यालयीन कामातही आनंदी ठेवण्यास मदत करते. यासाठी केलेल्या पाहणीदरम्यान 66 टक्के लोकांनी असे सांगितले की, मित्रांमुळे ऑफिसमध्ये काम करण्याचा उत्साह वाढतो. यातील 57 टक्के लोकांनी असेही नमूद केले की, मित्रांच्या सहवासामुळेच आमची क्षमताही वाढते. 2020 मध्ये झालेल्या या पाहणीनुसार 77 टक्के लोक आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत सकारात्मक मैत्रीसंबंध राखतात असे दिसून आले.
ब्रिटिश मानववंशशास्रज्ञ आणि संशोधक रॉबिन डनबार यांच्या मते, एक व्यक्ती 150 हून अधिक मित्रांशी मैत्री निभावू शकत नाही. यातील मोजकेच मित्र त्याच्या अगदी जवळचे असतात. ही संख्या किती असते यावर त्यांचे उत्तर आहे पाच. प्रत्येकाच्या आयुष्यात जास्तीत जास्त पाचच व्यक्ती अशा असतात ज्यांच्याशी ते आयुष्यातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकतात. बारकाईने विचार केला तर त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आढळेल! आपल्या आयुष्यातील असे पाच जण कोण आहेत पाहा आणि त्यांना त्यांच्या या स्थानाविषयीची कृतज्ञता आजच्या दिवशी नक्की व्यक्त करा!
– हेमचंद्र फडके