शहरात राहणाऱ्या एका श्रीमंत माणसाने खूप मोठे घर बांधले. त्यात त्यांनी चार ते पाच मोठमोठ्या खोल्या काढल्या. परंतु त्या घरात तो माणूस, त्याची पत्नी आणि मुलगी असे फक्त तीनच लोक राहत होते. त्यांच्या घरी कोणीही पाहुणे, आप्तेष्ट आले की, ते आपल्या घरातील प्रत्येक खोली मोठ्या अभिमानाने दाखवायचे. त्यातील एक मोठी खोली त्याने विशेष मौल्यवान वस्तूंसाठी केली होती. ज्यात मौल्यवान आणि महागड्या वस्तू शोभेच्या कपाटात लावलेल्या होत्या. ज्यावेळी पाहुणे त्याच्या त्या खोलीत जात असत तेव्हा तो त्यांना किमतीसह प्रत्येक वस्तूची माहिती देत असे. घरातील साहित्य, खिडक्या-दारांना लावलेल्या महागड्या काचा दाखवत असे.
एके दिवशी एक विख्यात साधू त्यांच्या घरी आले. त्यावेळी त्या नवरा-बायकोने साधूंचे योग्य आदरातिथ्यही केले. त्यानंतर भोजनापूर्वी त्याने आपले संपूर्ण घर फिरून साधूला दाखवले. साधूंनी विचारले, “तुम्ही तिघे एक छोटे कुटुंब आहात. एका खोलीतच राहता मग इतर खोल्यांमध्ये कोण राहतं?’ ती व्यक्ती तत्परतेने म्हणाली, “त्या खोल्यांमध्ये कोणीही राहत नाही.’
साधू म्हणाले, “नाही, मी या घरात आलो आहे, तेव्हापासून तुमच्या खोलीत काहीतरी बाधा आहे, असे मला वाटते.’
नवरा-बायकोच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. ते भूतबाधा, जादूटोणासारखे नाना काल्पनिक विचार करू लागले. ना राहवून त्या व्यक्तीच्या पत्नीने साधूंना विचारले,”साधू महाराज नेमके या खोल्यांमध्ये काय आहे? भूतबाधा वगैरे आहे काय?’
साधू हसत म्हणाले, “तुमच्या इतर खोल्यांमध्ये भूतांहून भयंकर बाधा आहे, पण तुमच्या घरात कोणती बाधा आहे हे मी आता सांगणार नाही? दोन-चार महिन्यांनी पुन्हा येईन तेव्हा सांगेन नेमके काय आहे ते. पण तू आतापासून उपचार सुरू करावं असं मला वाटतं.’
पती-पत्नी दोघांनीही होकारार्थी मन हलविली आणि विचारले, “तुम्ही आजार सांगत नसाल तर किमान उपचार तरी सांगा. आम्ही स्वतः उपचार सुरू करू.’
साधू म्हणाले, “आतापासून तुमच्या घरी आलेल्या पाहुण्याला तुमची खोली दाखवायला घेऊन जाऊ नका. पाहुणे रहायला आले तरच त्यांना दिवाणखान्यात घेऊन जा. त्याच्याशी कोणत्याही मौल्यवान वस्तू आणि घरगुती वस्तूंबद्दल चर्चा करू नका.’ दोन महिन्यांनी साधू परत आले. त्यांनी पती-पत्नीला विचारले, “तुम्ही तुमच्या घरात सध्या असलेल्या आजारावर मी सांगितलेले उपचार करत आहात का?’
दोघेही स्मितहास्य करीत “हो’ म्हणाले. साधूंनी विचारले, “तुम्हाला रोगाबद्दल जाणून घ्यायचे नाही का?’ यावर ती व्यक्ती म्हणाली, “महाराज, धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला हा आजार माहीत झाला. आम्ही आमच्या घरात एका खोलीत राहायचो आणि आमच्या अहंकाराचा रोग इतर खोल्यांमध्ये राहत होता. जेव्हापासून तुम्ही आम्हाला पाहुण्यांना खोल्या दाखवण्यास आणि त्यातील सामानांची किंमत दाखवण्यास मनाई केली होती तेव्हापासून आम्हाला कळले आहे की, प्रत्यक्षात आम्ही खोल्या दाखवत नसून आमचा अहंकार तृप्त करत आहोत.’
साधूंच्या चेहऱ्यावर विलक्षण हास्य उमटले. दोघांनाही आशीर्वाद देऊन साधू निघून गेले. आपल्याही मनात एक अशी खोली असते. ती म्हणजेच अहंकाराची खोली. व्यक्तिपरत्वे त्या खोलीचा व्यास आणि व्याप्ती ही भिन्न असते. यात माणूस मोठा नसतो तर त्याचा अहंकार मोठा असतो. अनेकदा आपल्याला त्याची जाणीवही होते पण नकळत का होईना आपण त्याला पोसत असतो. अहंकाररूपी शेकडो विचार आपल्या मनात येत असतात त्यांना आपल्याला रोखता आले पाहिजे. कारण विचारात बदल झाला तरच आचरणात बदल घडू शकतो. यासाठी आपण आपल्या मनातील या अहंकाराच्या खोलीवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे. स्वतःला नम्रपणाच्या, सकारात्मक दृष्टिकोनाच्या स्वयंसूचना दिल्या पाहिजेत.
मनातील विचारांसोबत वाहत न जाता त्यावर लक्ष, नियंत्रण ठेवले पाहिजे. ध्यानधारणा केली पाहिजे. इतरांबद्दल आपले मत हे आदरयुक्त ठेवले पाहिजे. आपल्या वागण्या बोलण्या चालण्यात “अहं’ भावनेचा लवलेशही नाही दिसला पाहिजे. अहंकारावर नियंत्रण ठेवून काम, क्रोध, मद, मत्सर यावर विजय मिळवता आला पाहिजे. आपल्या मनातील अहंकाराची भाड्याने दिलेली खोली कायमस्वरूपी खाली करायला हवी. अगदी संत नामदेव महाराजांनी अभंगातून मांडलेल्या ओळी प्रमाण मानून-
“अहंकाराचा वारा । न लागो राजसा ।
माझिया विष्णूदासा । भाविकांसी ।।
– सागर ननावरे