हिमालयाची सावली हे वसंत कानेटकर यांचे 1972 साली आलेले चरित्र नाटक आहे. या नाटकाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या नाटकाची आणि त्या वेळची सामाजिक परिस्थिती थोडी समजून घेण्याचा हा प्रयत्न…
कानेटकर यांनी या नाटकातील प्रमुख आणि दुय्यम व्यक्तिरेखा रंगविताना अंदाजे पाऊणशे वर्षापूर्वीच्या अनेक नामवंत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध रंग या मध्ये चितारले आहेत. काही घटना ही त्याच पद्धतीने नाटकात घडताना दिसतात. 1972 म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मागे वळून पाहताना, जुन्या काळातील माणसे, त्यांची जीवन चरित्रे, विचारधारा आणि एकूणच समाजातील कालप्रवाह कसा बदलत गेला त्याचे चित्रण या नाटकात आहे.
आज एकविसाव्या शतकात हे नाटक वाचताना, त्यातील पात्र रचना, व्यक्तिरेखा, कपडे, रंगभूषा सारे सारेच खूप बदललेले आहे. विसावे शतक संपून ही बराच काळ लोटला आहे. 19 व्या शतकात शेवटी शेवटी घडलेली ही कुणा एका ध्येयवेड्या माणसाच्या जीवनावरील नाटकातील व्यक्तिरेखा आजच्या काळाशी जोडता येत नाही. अशी ध्येयवेडी माणसे आता दुर्मिळ झाली आहेत. तो काळ, पुनर्विवाह मंडळ, अनाथ महिलाश्रम हे सारे आता खूपच बदलले आहे. पण अशी ध्येयवेडी माणसे त्या काळातही होती आणि आजही काही प्रमाणत आढळतात. माणसा पुढील समस्यांचे स्वरूप बदलले असेल, पण सामाजातील पीडितासाठी काम करणारे लोक आजही समाजात आहेत.
या नाटकात अशाच एका ध्येयवेड्या माणसाच्या कौटुंबिक जीवनाचे चित्र आहे. समाजाचा विचार करताना, घरातील लोकांकडे होणारे दुर्लक्ष, मुलाबाळांचे हाल, घरातील स्त्रीची होणारी कुचंबणा आणि शेवटी इतके सोसूनही अपयश पदरी झेलणारे हे पात्र म्हणजे नाना म्हणजे नानासाहेब भानू. जेव्हा पुण्यातील पार्वती हा भाग शहरापासून दूर होता, जिथे फक्त माळरान होते, त्या काळातील हे नाटक. त्या माळरानावर कसलीही सुविधा नाही. तिथे कुडाच्या भिंती असलेली एक झोपडी, वर पत्राचे छप्पर, पडवी ओसरी असलेले घर.
आता वाचताना देखील गंमत वाटते. पण या ठिकाणी नानांनी अनाथाश्रम विरोधकांना तोंड देत देत समर्थपणे चालविला. त्यासाठी भरपूर पायी वणवण केली आहे. देणग्या जमा करण्यासाठी दिवस दिवस पदरमोड करून लोकांचे उंबरे झिजवले आहेत. ते खरे तर कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, पण अनाथाश्रम बरोबर, महिला शिक्षण मंदिर उभारल्याने त्यांनी कॉलेजची नोकरी मुदतीआधी सोडली आहे. त्याचे पेन्शन त्यांना मिळते आहे. त्यांचे बरोबर पत्नी, मुलगा, मुलगी मानलेले मुलगा, जग्गू आणि तातोबा असे कुटुंब आहे.
नानाच्या घरात मुलगादेखील काम करीत आहे. आफ्रिकेतील जग्गू येत असल्याची तार आलेली आहे. दुसरा मुलगा प्रथम क्रमांक मिळवून पास झाला आहे. पण नाना याबाबत ठीक आहे एवढीच प्रतिक्रिया देणार आहेत. त्यांच्या डोक्यात सतत आश्रमाचे विचार आहेत. बयो ही या ध्येयवेड्या माणसाची पत्नी. ती बोलघेवडी, सरळ स्वभावाची आणि कोकणी पद्धतीने तोंडात सतत शिव्या असणारी आहे. मुलांसाठी कष्ट करणारी, आश्रमासाठी प्रसंगी स्वयंपाक करणारी पण दुर्लक्षित स्त्री आहे. पुरषोत्तम हुशार आहे पण नानांवर त्याचा राग आहे.
तातोबा कोकणातून आलेला आहे. इकडे नानांना मदत करतो आहे. नानांना विम्याचे पैसे मिळाले आहेत. पण मुलाला परदेशी जाण्यासाठी देत नाहीत. आश्रमासाठी वापरतात. बायोचा याला विरोध आहे. पण नानाचे संसारात लक्ष नाही. जगू आफ्रिकेतून येतो पण नानांना वेळ नाही त्याच्याशी बोलायला. तातोबा आणि बयोला ते आश्रमापासून दूर ठेवतात. पुरुषोत्तम परदेशी शिकून मोठा होतो… बंगला बांधतो. त्यांची पत्नी डॉक्टर आहे. ती नानांशी मोकळेपणे बोलते. मुलाच्या घरातही ते पैसे देत राहतात. त्यांनी सांभाळलेला केशव आणि त्यांची मुलगी यांचे लग्न बयो ठरवत असते. पण नाना त्याला विरोध करतात. केशव आश्रम सांभाळावा असे त्यांना वाट असते.
केशव आणि आबाजी मुंबईला जातात. शेटजी देणगी देताना आश्रम मुंबईला हलवावा अशी अट घालतात. नाना नियमाप्रमाणे वागणारे असतात. जावई झाल्यावर केशवला आश्रम सोडायला सांगतात. डॉक्टर सुनेला नानाबद्दल फार आदर असतो. ती म्हणते, “आपले भाग्य की असा थोर पुरुष आपला घरात आहे. तो हिमालय एवढा आहे.’ तेव्हा बयो तिला म्हणते, “तू हिमालयाची सावली पाहिलीस कारण तू सून आहेस. अशा माणसाची बायको होणे खूप अवघड आहे.’
आश्रमाचा ठराव बाकी लोक एक मताने मंजूर करतात. उलट नानांनाच काउन्सिलवरून काढून टाकतात. आश्रम मुंबईला हलविण्याचाही निर्णय होतो. नानाचे विचार मंडळींना पटत नाहीत असे स्पष्ट सांगतात. शेटजींच्या पैशावर सगळे भाळतात.हे नानांना पटत नाही. त्यांना धक्का बसतो. सर पदवी पण नाकारतात. फार दुखावले जातात. आपण लावलेले रोपटे ज्याचा वटवृक्ष झाला तो वृक्षच उन्मळून पडताना त्यांना पाहवत नाही आणि याला कारणही आपलेच लोक. यातून बाहेर पडण्यासाठी खडकावर वाड्यात कर्मयोगी मठ उभारण्याचे ठरवितात. बयो त्यांचे बरोबर असते.
पुरुषोत्तम बंगल्यातील दोन खोल्या द्यायला तयार नसतो. तो आईला म्हणतो, “तू आहेस म्हणून नाना मोठे झाले. तू झिजलीस म्हणून ते हिमालया एवढे झाले.’ बयो मुलाला म्हणते, “तुला सूर्य पाहिजे पण ऊन नको. सूर्याच्या छायेत राहताना चटके तर बसणारच.’ ती शेवटी त्याला म्हणते, “तू हिमालय पाहिला आहेस का… मी पण नाही पाहिला.. पण आपण उभे आहोत हिमालयाच्या सावलीला त्याच्या पायथ्याशी. वर फक्त आभाळ आहे. शिखर दिसत नाही तेथपर्यंत आपली नजर पोचतच नाही.’
अशा ध्येयवेड्या थोर पुरुषाची ही सावली. तिची घनगर्द छाया वसंत कानेटकर यांनी, त्यांच्या भाषा शैलीने, प्रसंग वर्णने, व्यक्तीच्या स्वभावाचे विविध पैलू दाखवत, नातेसंबंध उलगडवत, जीवनानुभव देणारी लिहिली आहे. डॉ. श्रीराम लागू आणि शांता जोग यांच्या उतुंग अभिनयाने ही सावली अधिकच गडद होते. नंतरच्या काळात या भूमिका अनेक सक्षम कलाकारांनी साकारल्या आणि हे नाटक रंगभूमीवर सुरू राहिले. पन्नास वर्षांच्या दीर्घ कालावधी नंतर ही सावली हवीशी वाटणारी आहे.
– आरती मोने